पारगाव, (वार्ताहर)- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे दौंड तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या २० कुटुंबीयांना ४० लाखांची मदत मंजूर झाली असून त्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखांच्या धनादेशाचे वाटप आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले.
दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे आर्थिक मदत मिळावी यासाठी आमदार राहुल कुल यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता.
त्याद्वारे दौंड तालुक्यातील अपघाती मृत्यू झालेल्या २० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांच्या मदतीच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. यामध्ये ऑक्टोबर २०२२ मध्ये मौजे रावणगाव येथे ट्रॅक्टर ट्रॉली कालव्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या ३ मजूर भगिनींच्या कुटुंबीयांचा देखील समावेश आहे.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेद्वारे खालील मयत शेतकऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे- रेश्मा भागुजी पानसरे (रा. रावणगाव), सुरेखा बाबासो पानसरे (रा. रावणगाव), अश्विनी प्रमोद आटोळे (रा. रावणगाव), मारुती गुलाब दिवेकर (रा. पारगाव), विलास अर्जुन माने (रा. हिंगणीबेर्डी), चंद्रकांत बबन रांधवन (रा. रावणगाव), दिनकर गांडले
(रा. पारगाव), सचिन भीमराव ताम्हाणे (रा. ताम्हणवाडी), संकेत सदाशिव म्हेत्रे (रा. बोरीऐंदी), विष्णु मुरलीधर पाचपुते (रा. बोरीबेल), स्वप्निल बाळासाहेब दरेकर (रा. बोरीऐंदी), शंकर काशिनाथ काळे (रा. मलठण), मनोहर विठ्ठल दिवेकर
(रा.पाटस), संजय नरहरी शिंदे (रा. हातवळण), प्रफुल्ल अर्जुन शितोळे (रा. कुसेगाव), अरविंद मुगुटराव भगत (रा. वासुंदे), पोपट भागुजी मरगळे (रा. मेरगळवाडी), सुदाम मुगुटराव शेळके (रा. केडगाव), संपत कोंडीबा चौधरी (रा. खोर).
यावेळी तालुका कृषी अधिकारी राहुल माने, भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अरुण आटोळे, भाजपा नेते तानाजी दिवेकर, भीमा पाटसचे संचालक विकास शेलार आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.