राहू, (वार्ताहर)- राज्यातील जवळ जवळ 42 हजार कंत्राटी कामगार हे सोमवार (दि.४) पासून बेमुदत संपावर गेलेले आहेत. त्याचा परिणाम दौंड तालुक्यातील राहू बेट परिसरात देखील जाणवत आहे. बेट परिसरातील विजेच्या कामकाजाचा सध्या बोऱ्या वाजलेला दिसत आहे.
बेट परिसर हा पूर्ण बागायती परिसर आहे. त्यामुळे कृषीपंपाच्या विजेला मागणी असते. परंतु त्याच्यावर परिणाम झालेला दिसून येत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिके मोठ्या प्रमाणात निस्तेज होत आहे. परंतु विजेच्या अडचणीमुळे पिकांच्या पाण्याची पूर्तता होताना दिसत आहे.
घरगुती ग्राहकांचे देखील हाल होताना दिसत आहे. साधा फ्युज गेला तरी चार चार तास अंधारात रहावे लागत आहे. एक महिना जरी घरगुती वीज बिल थकले तरी लगेच वीज जोड तोडली जात आहे. परंतु सेवा मात्र तशी दिली जात नाही.
कंत्राटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. या संपामुळे सेवेवर काही प्रमाणात परिणाम जाणवत आहे. अनेक छोट्या छोट्या व किरकोळ कामासाठी ग्राहकांना वाट पाहावी लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर समन्वय निघाल्यास ग्राहकांना व्यवस्थित सेवा देता येईल. – पप्पू पिसाळ, कनिष्ठ अभियंता, पिंपळगाव.