नगर -लॉकडाऊन काळात जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूरांची घरवापसी सुरु आहे. केडगाव येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्राच्या निवारा गृहामधून 34 तर मनपाच्या नक्षत्र लॉन येथील 4 अशा 38 परप्रांतीय मजूरांना गुरुवार रोजी रात्री उशीरा उत्तर प्रदेशला दोन खाजगी बसने रवाना करण्यात आले.
बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे निवारा गृह सोडताना मिळालेल्या माणुसकीच्या वागणुकीने परप्रांतीय भारावले. मिळालेल्या पाहुणचाराचे कौतुक करुन त्यांनी संस्थेचे, मनपा व पोलीस प्रशासन यांचे विशेष आभार मानले. तर निरोपदेत असताना त्यांच्या डोळ्याच्या कडाही पाणवल्या. शुक्रीया…, तुम हमेशा दुवा मे याद रहोंगे…, भगवान तुम्हे हमेशा खुश रखे… मुलूक आये तो जरुर मिलना… असे भावनिक वाक्य या मजूरांच्या तोंडून पडत होते.
जिल्ह्यातून आतापर्यंत 13 हजाराहून अधिक परराज्यातील मजूर व विद्यार्थ्यांनी आपल्या राज्यात घरी जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे नोंद केली आहे. यात सर्वाधिक लोक उत्तरप्रदेशचे आहेत. बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात 30 मार्च पासून केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डिऍब्रो व ब्रदर व्हिन्सेंट यांच्या मार्गदर्शनाखाली निवारा गृह (शेल्टर होम) चालविण्यात आला. हा निवारागृह या मजूरांसाठी लॉकडाऊन काळात मोठा आधार बनला.
यामध्ये उत्तरप्रदेश, बेळगाव, गुजरात, बुलढाणा, हिंगोली येथील 55 परप्रांतीय मजूर वास्तव्यास होते. यांच्या खाण्या-पिण्यासह आरोग्याची देखरेखची जबाबदारी देखील बॉस्को ग्रामीण विकास केंद्राने उचलली.