नवी दिल्ली – भारताजवळ सध्या मुबलक प्रमाणात गहू उपलब्ध आहे. जागतिक बाजारपेठेत गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे गव्हाला चांगली किंमत मिळत आहे. अशा परिस्थितीत एप्रील ते जुलै या कालावधीत तब्बल 35 लाख टन गव्हाची निर्यात होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय सहसचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले.
रशिया आणि युक्रेनमधून जगाला गव्हाची निर्यात होत होती. मात्र या दोन्ही देशांमधून सध्या ही निर्यात थंडावली असतानाच भारताला गहू निर्यात करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. याची जाणीव देशातील गहू निर्यातदारांना झाली असून निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी आतापर्यंत 35 लाख टन गहू निर्यातीची कंत्राटे केली असल्याचे त्यांनी सांगितले.
2021 -22 मध्ये भारताने तब्बल 70 लाख टन गव्हाची निर्यात केली आहे. त्या अगोदरच्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये भारताने केवळ 21 लाख टन गव्हाची निर्यात केली होती. भारतीय शेतकऱ्यांनी कठीण परिस्थितीतही गव्हाचे उत्पादन अतिरिक्त केले आहे. त्यामुळे करोनाच्या दोन वर्षाच्या काळामध्ये भारताला अन्नधान्याची कसलीही टंचाई निर्माण झाली नाही. उलट या काळात भारताने मोठ्या प्रमाणात गहू निर्यात करून जगाची भूक भागवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातून जास्त प्रमाणात गहू निर्यात केला जात आहे. कारण ही राज्य निर्यात करणाऱ्या बंदराच्या जवळ आहेत. त्यामुळे वाहतूक करणे सोयीचे होते. जर जागतिक बाजारपेठेत गव्हाचे दर आणखी वाढले आणि मागणी वाढली तर या कंपन्या इतर राज्यातून गहू खरेदी करून निर्यात करतील. जर खासगी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात निर्यातीसाठी गव्हाची खरेदी केली तर केंद्र सरकारकडून होणाऱ्या गहू खरेदीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो.
मात्र यासंदर्भात आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. केंद्र सरकारचे परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. देशांतर्गत गरजेवर कसलाही परिणाम होणार नाही अशा पद्धतीने गव्हाची निर्यात केली जाईल असे पांडे यांनी सांगितले. या वर्षी गव्हाची निर्यात तब्बल 100 लाख टनापर्यंत जाऊ शकते असे गेल्या आठवड्यात केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. बऱ्याच देशानी भारताकडे गव्हाची मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. भारत जगातील गहू उत्पादन करणारा सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.