कार्ला, – एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेसाठी आलेल्या एका भाविकांचा खून झाल्याची घटना आज (दि. 9) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वेहेरगावच्या तळ्याजवळ घडली आहे. मनोज कुंडलिक पाटील (वय 49, रा. कोपरी ठाणे) असे या खून झालेल्या भाविकाचे नाव आहे. तर हर्षल चंद्रकांत पाटील (रा. कोपरी ठाणे) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राहूल भास्कर पाटील यांनी चार अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी फिर्यादीवरून दिलेल्या माहितीनुसार, वेहेरगाव पायथा मंदिरासमोरली रस्त्यावर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मयत व जखमी यांच्या ग्रुपमधील कार्तिक प्रकाश म्हात्रे यांचा मोबाईल चोरीला गेला. यावेळी शेजारी असलेल्या अनोळखी व्यक्तीकडे मोबाईल तुम्ही घेतला का? अशी विचारणा केल्याच्या कारणावरून हे भांडण झाले.
यामध्ये अनोळखी व्यक्तीमधील एकाने तीक्ष्ण हत्याराने मनोज पाटील यांच्या छातीवर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर या घटनेचा तपास करत आहेत.