कबीर बोबडे
नगर – सर्वसामान्य मातेला गरोदरपणातील उपचार व प्रसूती सुरक्षित होण्यासाठी तसेच माता, बाल-मृत्यू दर कमी करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात गेल्या तीन वर्षात तब्बल 18 हजार 246 गरोदर मातांची नोंदणी करून तपासणी करण्यात आली आहे. त्यात तपासणीमध्ये 317 महिलांची प्रसूती “हाय रिस्क’ (अति जोखमीची) असल्याचे आढळून आले. जिल्हा रुग्णालयांतर्गत येणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयामार्फत पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान राबवत आहेत.
हाती आलेल्या आकडेवारीनुसार सन एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंत 3 हजार 388 गरोदर मातांनी नोंदणी करून तपासणी केली. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात मातांची संख्या 1 हजार 843 इतकी असून त्यात अति जोखमीच्या मातांची संख्या 317 एवढी आहे. मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर दिवसेंदिवस अति जोखिमेची प्रसूती असलेल्या मातांची संख्या वाढत आहे. हिमोग्लोबीन, डायबीटीज, हायपरटेंशन, रक्तशय अशा आजार असलेल्या 317 एवढी संख्या आहे. यांची प्रसुती हाय रिस्क’ संबोधली गेली असून त्यांची प्रसूती सुखद करण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.
गतवर्षीच्या आकडेवारीनुसार अतिजोखमीच्या मातांमध्ये एचआयव्ही आढळून आलेल्या मातांची संख्या 6 तर मधूमेह आढळून येणाऱ्या मातांची संख्या 1 होती. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानच्या माध्यमातून होणारा तपासणी, पूर्वप्रसूतीकाळात घ्यावयाची काळजी, आहार व व्यायाम याबाबत महिलांमध्ये जागृती करणे व त्यासाठी कार्यान्वित असलेल्या सरकारी योजनांचा प्रसार आरोग्य यंत्रणेकडून सुरू असल्याचे सांगितल्या जाते.
मातृत्व अभियान जिल्ह्यात राबवले जात असून आजवर अनेक गरोदर मातांची तपासणी करून घेतली. ज्या महिला अति जोखमीच्या प्रसूतीच्या आढळून आल्या, त्यांना आपण विशेष सुविधा देतो. त्यांच्यासाठी खाजगी स्त्रीरोगतज्ञ आणतो. या अभियानामुळे महिलांना प्रसूतीच्या काळात आरोग्यविषयक सुविधा मिळतात. जोखमीच्या प्रसूतीवेळी मातांची मृत्युंची संख्या वाढते त्यामुळे गर्भभारपणात मातांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आपण दर महिन्याच्या 9 तारखेला गरोदर मातांची तपासणी करतो.
-डॉ. बापूसाहेब गाडे, प्रभारी, जिल्हा शल्य चिकित्सक