दोन माजी मंत्र्यांचाही समावेश
काठमांडू –भूतानच्या नकली शरणार्थ्यांच्या प्रकरणी नेपाळमधील 30 जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. यामध्ये नेपाळमधील 2 माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. भूतानच्या शरणार्थ्यांच्या आडून नेपाळी नागरिकांना परदेशात पाठवण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप या सर्वांवर आहे. जिल्हा ऍटर्नी कार्यालयाने काठमांडू जिल्हा न्यायालयामध्ये 224 पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
माजी गृहमंत्री बाल कृष्ण खंड आणि माजी उपपंतप्रधान टोपे बहादूर रायमांझी यांच्यासह 16 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित 14 जण फरार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रायमांझी यांना कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाईड-मार्क्सवादी- लेनिनवादी) पक्षाच्या सरचिटणीसपदावरून निलंबित करण्यात आले आहे.
आरोप ठेवलेल्या व्यक्तींकडून 270 दशलक्ष रुपयांच्या वसुलीची मागणी करण्यात आली आहे, असे जिल्हा दंडाधिकारी महेश खत्री यांनी सांगितले. या आरोपींनी 875 नेपाळी व्यक्तींकडून लक्षावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे.
आरोपींवर गुन्हेगारी देशद्रोह, सामूहिक गुन्हे, गैरव्यवहार आणि बनावटगिरीचे आरोप आहेत.