नवी दिल्ली – वर्ष 2004 ते 2014 या काळात अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने 112 छापे टाकले होते, तर मोदी सरकारच्या काळात आठ वर्षांत या छाप्यांची संख्या 3010 झाली आहे. मोदी सरकारच्या हुकूमशाही राजवटीत ईडीचे नवे नाव आणि नवे काम लोकशाहीला नष्ट करण्याचे आहे, असा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे.
‘भारत जोडो यात्रे’नंतर या आठवड्यात छत्तीसगडमधील रायपूर येथे कॉंग्रेस पक्षाचे महाअधिवेशन होत आहे. ईडीने सोमवारी छत्तीसगडमधील पीसीसी कोषाध्यक्ष राम गोपाल अग्रवाल, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, गिरीश दिवांगन, आरपी सिंह, विनोद तिवारी आणि सनी अग्रवाल यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले.
कॉंग्रेस पक्षाच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकारमध्ये ईडीने छापे घातलेले किंवा चौकशी केलेले 95 टक्के राजकारणी विरोधी नेते आहेत. यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर सर्वाधिक छापे टाकण्यात आले आहेत. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने छापा टाकला. राहुल गांधी यांची ईडीने 50 तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. यानंतर सोनिया गांधी यांची तीन दिवस चौकशी करण्यात आली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची ईडीने 7 तास चौकशी केली.
कॉंग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश आणि पवन खेरा म्हणाले की हिमंता बिस्वा सरमा, जे आता आसामचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची ईडी आणि सीबीआयने चौकशी केली होती. शारदा चिटफंड घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यावेळी ते कॉंग्रेस पक्षात होते. सीबीआयने त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकून चौकशीही केली होती. नंतर ते भाजपमध्ये गेले, नंतर ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये म्हणजेच ‘ईडी’मध्ये स्वच्छ धुतले गेले.
कोणत्या पक्षाचे किती नेते ईडीच्या निशाण्यावर?
2014 पासून आतापर्यंत ईडीने कॉंग्रेस पक्षाशी संबंधित 24 नेत्यांवर छापे टाकले आहेत. तृणमूल कॉंग्रेस 19, राष्ट्रवादी कॉंग्रेस 11, शिवसेना 8, डीएमके आणि बिजू दनता दल प्रत्येकी सहा, राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, तेलुगु देशम पार्टी प्रत्येकी पाच, भारतीय राष्ट्रीय लोकदल आणि वायएस आर कॉंग्रेस प्रत्येकी तीन, कम्युनिस्ट पार्टी, पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स प्रत्येकी दोन आणि ए आयएडीएमके, मनसे, एसबीएसपी प्रत्येकी एक अशा संख्येत तपास यंत्रणेने नेत्यांवर धाडी घातल्या आहेत.