ढाका – बदली कर्णधार लोकेश राहुल याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आजपासून सुरू होत असलेल्या यजमान बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसह ही मालिकाही जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. हा मालिका विजय साकार झाल्यास भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.
‘त्या’ विश्वविक्रमी अंड्याला मेस्सीने टाकले मागे; नावावर केला अनोखा विक्रम
बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पराभूत झालेल्या भारतीय संघाने कसोटी मालिकेत मात्र पहिली कसोटी जिंकत यशाच्या मार्गावर प्रवास सुरू केला. नवोदित शुभमन गिल व अनुभवी चेतेश्वर पुजारा यांनी दमदार शतकी खेळी केल्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. त्यानंतर रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव व महंमद सिराज यांच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशला सपशेल पराभव पत्करावा लागला. आता या कसोटीतही त्यांच्याकडून अशाच खेळीची गरज आहे.
‘त्या’ विश्वविक्रमी अंड्याला मेस्सीने टाकले मागे; नावावर केला अनोखा विक्रम
गिल व पुजारा वगळता पहिल्या कसोटीत अन्य फलंदाजांकडून साफ निराशा झाली होती. आता या कसोटीत मात्र बदली कर्णधार राहुलसह विराट कोहली, श्रेयस अय्यर यांच्याकडून मोठ्या खेळीची गरज आहे. तसेच यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या जागी श्रीकर भरतला खेळवले गेले तर त्यालाही कसोटी संघातील स्थान निश्चित करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून केवळ 2 गडी बाद केलेल्या उमेश यादवच्या जागी फलंदाजीतही चमकदार कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या शार्दुल ठाकूरला संधी मिळेल असेच चित्र दिसत आहे. मुळातच भारतीय संघाला ही कसोटी जिंकायची असेल तर गोलंदाजीत विविधता राखणे गरजेचे आहे.
दुसरीकडे बांगलादेशबाबत बोलायचे तर त्यांची फलंदाजी व गोलंदाजीत भारताला तुल्यबळ लढत देण्याची निश्चितच क्षमता आहे, मात्र त्यांच्या खेळाडूंकडे सातत्याचा अभाव दिसतो. मेहदी हसन, कर्णधार शकिब अल हसन मुशफिखूर रहिम, नजमुल शांतो हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत, मात्र त्यांच्याकडून सांघिक कामगिरी होत नसल्यानेच त्यांना अपयशाचा सामना करावा लागत आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात त्यांनी जशी कामगिरी केली तशीच त्यांनी या कसोटीत केली तर भारतासमोर ते मोठे आव्हान ठरणार आहे.
नेतृत्व व कामगिरीचे राहुलवर दडपण
नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेत खेळत नसल्याने लोकेश राहुलकडेच नेतृत्व कायम राहणार आहे. मात्र, गेल्या काही काळापासून त्याला नेतृत्वातच नव्हे तर वैयक्तिक कामगिरीतही चमक दाखवता आलेली नाही. आता या कसोटीत त्याला या दोन्हीबाबतची जबाबदारीने कामगिरी करावी लागणार आहे.