अमरावती -आंध्रप्रदेशात 2 नोव्हेंबरपासून इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पुन्हा सुरू झाल्या. तेव्हापासून 3 दिवसांत 262 विद्यार्थ्यांना आणि सुमारे 160 शिक्षकांना करोनाची बाधा झाली.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीस देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला. तेव्हापासून आंध्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद होत्या. आता त्या राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे.
त्याअंतर्गत इयत्ता 9 वी आणि 10 वीचे वर्ग सुरू झाल्यानंतर काही विद्यार्थी आणि शिक्षकांना करोनाबाधा झाली असली तरी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आंध्रच्या शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. बुधवारी 3 लाख 93 हजार विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये हजेरी लावली.
त्या संख्येचा विचार करता बाधित विद्यार्थ्यांचे प्रमाण 0.1 टक्काही नसल्याकडे त्या विभागाने लक्ष वेधले. अर्थात, पालकांमध्ये अजूनही करोनाची धास्ती असल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती 40 टक्क्यांच्या आसपासच असल्याची कबुलीही त्या विभागाकडून देण्यात आली.
आंध्रात इयत्ता 9 वी आणि 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 9 लाख 75 हजार इतकी आहे. तर शिक्षकांची संख्या 1 लाख 11 हजार इतकी आहे. त्यातील 99 हजारांहून अधिक शिक्षक बुधवारी शाळांमध्ये उपस्थित होते.