मुंबई – गेल्या पाच वर्षांमध्ये बॅंकिंग घोटाळ्यात सुमारे 268 टक्के वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये बॅंकांनी 19 हजार 455 कोटी रुपयांच्या बॅंकिंग घोटाळ्यांची माहिती दिली होती. वर्ष 2018-19 मध्ये हा आकडा 71 हजार 543 कोटी रुपये झाला.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेनं आपल्या “ट्रेंड अँड प्रोग्रेस ऑफ बॅंकिंग इन इंडिया, 2018-19′ या अहवालात ही माहिती दिली आहे. या काळात बॅंकिंग घोटाळ्यांची संख्या चार हजार 639 वरून वाढून सहा हजार 801 झाली. बॅंकिंग घोटाळ्याच्या एकूण संख्येत सरकारी बॅंकांचा वाटा 55.4 टक्के आहे. रकमेच्या आधारावर या बॅंकांचा हिस्सा 91.6 टक्के आहे.
वर्ष 23018-19 मध्ये झालेले एकूण बॅंकिंग घोटाळे गेल्या वर्षीच्या तुलनेत 74 टक्कयांनी जास्त आहेत.
वर्ष 2017-18 मध्ये एकूण चार हजार 167 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. तो 2018-19 मध्ये वाढून सात हजार 543 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. 2018-2019 मध्ये सर्वात जास्त घोटाळा कर्ज आणि ऑफ शीट बॅलन्स सेक्शनमध्ये झाला आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, 2015-16 हे वर्ष वगळता बॅंकिंग घोटाळा दर वर्षी वाढतो. गेल्या पाच वर्षांमध्ये बॅंकिंग घोटाळे संख्येने 47 टक्के आणि रकमेच्या आधारावर 268 टक्के वाढले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत घोटाळ्यात 74 टक्के वाढ झाली आहे. वर्ष 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये बॅंकांनी 64 हजार 548 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यांची माहिती दिली आहे. 2014-15 मध्ये ही रक्कम 17 हजार 122 कोटी रुपये होती. म्हणजे, गेल्या पाच वर्षांमध्ये या श्रेणीत 268 टक्के वाढ झाली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांमध्ये कार्ड किंवा इंटरनेट घोटाळ्याची रक्कम 36 टक्कयांनी वाढली.