राजगुरूनगर : खेड तालुक्यातील सुरकुंडी येथे आज दोन व्यक्तीना कोरोनाची लागण झाली असून तालुक्याची संख्या ३१ वर पोहचली आहे. मात्र तालुक्यातील त्यापैकी १९ रुग्ण बरे होऊन घरी आल्याने तालुक्यासाठी दिलासादायक घटना असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, सभापती अंकुश राक्षे यांनी दिली.
खेड तालुक्यात सुरकुंडी येथे २ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. त्या भोसरी (पुणे) येथे ये जा करीत होत्या. त्यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या ३१ वर पोहचली आहे. तालुक्यातील येलवडी गावातील आठ करोना बाधित रुग्णांची पिंपरी चिंचवड मध्ये गणती होत आहे. कडूस येथील एक रुग्ण मुंबई येथे उपचार घेत आहे. सुरकुंडी येथे कंटेनमेंट झोन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून तहसीलदार सुचित्रा आमले, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. गामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहून बाहेरगावी जाणाऱ्या येणाऱ्याव्यक्तींवर लक्ष ठेवून प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
खेड तालुक्यातील आतापर्यंत १९ जणांनी करोनावर मात केली असून उपचारानंतर ते बरे होऊन घरी आल्याने तालुक्यासाठी दिलासादायक बातमी आहे .तालुक्यातील राक्षेवाडी(५), कडूस (३), कुरकुंडी (३), पापळवाडी (४), पाईट, वडगाव, चाकण, बुरसेवाडी येथील प्रत्येकी एक असे १९ रुग्ण बरे होऊन घरी आले आहेत. दरम्यान खेड तालुक्यात ग्रामीण भागात करोना बाधित रुग्णाची संख्या वाढत आहे.
कोरोनाचे लोण ग्रामीण भागात पोहचले असून मुंबई नंतर आता पुणे येथून आलेल्या व्यक्ती कोरोना बाधित सापडत असल्याने ग्रामीण भागातील गावांमध्ये भीतीजन्य वातावरण आहे. गावातील नागरिकांनी सुरुवातीपासून शासनाची आचार संहिता पाळली मात्र आता शेवटी गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने बाहेरगाववरुन आलेल्या व्यक्तीमुळे गावांवर संकट येत आहे असे अनेक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
राजगुरूनगर, आळंदी नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. मात्र, चाकण नगर परिषद हद्दीत काल (दि.६) एक रुग्ण सापडला असल्याने खळबळ उडाली आहे आतापर्यंत सर्वानी नियमांचे पालन केल्याने कोरोनावर मात केली होती. यापुढे नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.
खेड तालुक्यात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात करोनाबाधित व्यक्तींचे संख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करावे, आरोग्य विभागाने दिलेल्या नियम अटींचे पालन करावे, बाहेरगावावरून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात जाऊ नये, बाहेरून आलेल्यांची स्वतःहून क्वारंटाईन व्हावे, गावाला व प्रशासनाला सहकार्य करावे, सोशल डिस्टन्स पाळावा मास्क लावावा, आदी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन सभापती अंकुश राक्षे, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.