सातारा – कर फेर आकारणी, करवसुली, ग्रामपंचायतीची वसुली याकडे दुर्लक्ष करण्याबरोबरच नोंदवह्या अद्ययावत न ठेवणे, पावती पुस्तके अद्ययावत करुन न घेता वापरणे, दप्तर त्रुटींबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत जिल्ह्यातील 175 ग्रामसेवकांना नोटीसा बजावल्या आहेत. एक वेतनवाढ दोन वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद का करु नये, तसेच दप्तरातील त्रुटींबाबत गट विकास अधिकाऱ्यांमार्फत आठ दिवसांत खुलासा सादर करावा, अशी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.
जिल्ह्यात एक हजार 496 ग्रामपंचायती असून ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर मोठी जबाबदारी असते. ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कारभार व दप्तरातील त्रुटींबाबत जिल्हा परिषदेकडे अनेक तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी संबंधित ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी करण्याचे आदेश दिले होते. जिल्हा परिषदेत झालेल्या दप्तर तपासणीनंतर 175 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कामकाजाबाबत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. अनेक ग्रामंचायतींच्या कर फेरआकारणीची प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत सूचना देऊनही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही.
नोंदवह्या अद्ययावत न ठेवता नमुना नं. 8, 9 व 6 अपूर्ण ठेवणे, करवसुलीसाठी ग्रामपंचायत अधिनियमाप्रमाणे कार्यपध्दती न अवलंबणे, खातेदारांना कर मागणी बिले मुदतीत न देणे, नमुना नंबर 10 मधील पावती पुस्तके प्रमाणित न करणे, बोगस पावती पुस्तकांच्या आधारे करवसुली करुन अपहार करणे, ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न न करणे, नमुना नं. 8 व 9 चे महा ईग्राम संगणक प्रणालीत संगणकीकरण न करणे, फेरआकारणीची प्रक्रिया पूर्ण न केल्याने व खातेदारांना मागणी बिले न दिल्याने करात पाच टक्के सूट मिळण्यापासून खातेदारांना वंचित ठेवणे, ग्रामपंचायत मालकीच्या जागा, इमारती भाडेपट्ट्याने न देणे, भाडे करार न करणे, 3 वर्षापेक्षा अधिक मुदतीच्या भाडेपट्ट्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची पूर्ण मंजुरी न घेणे आदी मुद्यांवर कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे.
ग्रामीण भागाच्या विकासात ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे असून काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींची दप्तर तपासणी करण्यात आली. यामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या असल्याने संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पुढील आठ दिवसांत सर्व ग्रामपचायतींची दप्तर तपासणी करण्यात येईल.
ज्ञानेश्वर खिलारी,मुख्य कार्यकारी अधिकारी