दैनंदिन अहवालातच जातोय वेळ
पुणे – शहराच्या करोना नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचा दिवस दैनंदिन अहवाल आणि अधिकाऱ्यांकडून रोज वेगवेगळ्या पध्दतीचे मागविण्यात येणारे अहवाल पूर्ण करण्यातच जात आहे.
पुणे शहरात करोना नियंत्रणासाठी तब्बल 17 आयएएस अधिकारी असून प्रत्येकाला वेगवेगळा अहवाल देणे तसेच राज्यशासन आणि केंद्र शासनाला वेगवेगळे, असे तब्बल 50 ते 60 अहवाल दररोज महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तयार करावे लागत आहेत. त्यामुळे करोना नियंत्रण बाजूलाच पडले असून अधिकाऱ्यांचा वेळ मात्र अहवाल तयार करण्यातच जात असल्याने सर्वच वैद्यकीय अधिकारी वैतागले असून आम्ही करोना नियंत्रणाचे काम करू तरी कधी, असा सवाल संबंधित अधिकारी उपस्थित करत आहेत.
करोना नियंत्रणासाठी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाचे तसेच शासनाकडून विशेष करोना नियंत्रणासाठी अधिकारी नेमणूक करण्यात आलेले आहेत.
करोना नियंत्रणाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे कोणतेही काम अथवा बैठका असतील तर आढाव्यासाठी प्रत्येकाला करोनाचे स्वतंत्र अहवाल तयार ठेवावे लागत आहेत. दिवसभरातील करोना संदर्भातील घडामोडींचा अहवाल तोही बिनचूक करण्यात या अधिकाऱ्यांचा वेळ जात आहे.
विशेष म्हणजे अनेक अधिकाऱ्यांकडून कोणतीही पूर्वसूचना न देता तातडीनं या संदर्भातील अहवाल मागितले जात आहेत. त्यामुळे शहराच्या आरोग्य नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुखांसह, प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी आणि कोविड केअर सेंटरचे काम पाहणाऱ्या डॉक्टरांना संपूर्ण दिवस अहवाल तयार करण्यातच संपूर्ण दिवस घालवावा लागत आहे. परिणामी, महापालिकेचे अधिकारी अहवाल तयार करूनच थकले असून अशा स्थितीत करोना नियंत्रणांसह इतर कामांवर त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव निदर्शनास येत आहे.
महापालिका अधिकाऱ्यांची व्यथा…
अहवाल तयार करून देणाऱ्या या अधिकाऱ्यांवरच पुन्हा आढावा बैठकीत बोलणी खाण्याची वेळ येत असल्याचे समोर आले आहे. जेव्हा आढावा बैठक होते, त्यावेळी इतर जबाबदाऱ्या नीट सांभाळत नसल्याचा ठपका ठेवत याच अहवालातील आकडेवारीवरून अहवाल करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच फैलावर घेतले जात असल्याची व्यथा अधिकारी मांडत आहेत. करोना नियंत्रण किंवा तत्सम जबाबदारी देण्यात आलेली असताना अहवालावरच वरिष्ठ अधिकारी समाधान मानत असल्यानेच शहरातील स्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.