नवी दिल्ली : जगाला वेठीस धरणाऱ्या करोनाने देशात चांगलाच हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. कारण आता करोनाबाधितांची संख्या देशात 24 हजार 506 वर पोहचली आहे. चोवीस तासांत 57 जणांचा मृत्यू तर 1429 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत आढळलेल्या 24 हजार 506 जणांमध्ये सध्या उपचार सुरू असलेले 18 हजार 668 रुग्ण, रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 5 हजार 063 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 775 जणांची संख्या समाविष्ट आहे.
1429 new #COVID19 cases & 57 deaths reported in the last 24 hours as India’s total number of positive cases stands at 24,506 (including 5063 cured/discharged/migrated and 775 deaths) https://t.co/LpckKJ7nOb
— ANI (@ANI) April 25, 2020
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 14 एप्रिलपर्यंत जाहीर केलेला लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवला आहे. मात्र अद्यापही करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. ताज्या आकडेवारीनुसार देशातील रुग्णसंख्या 24 हजार 506 झाली आहे. पण जर भारताने वेळेत लॉकडाउन जाहीर केला नसता तर रुग्णांच्या संख्या एक लाखांहून अधिक असती अशी माहिती उच्चाधिकार गट-क्रमांक (1)चे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
लॉकडाउन लागू केला नसता तर देशातील करोनाबाधितांचा आकडा एक लाखांहून अधिक असला असता. त्यामुळे लॉकडाउन योग्य वेळी अमलात आणला गेला असल्याचे पॉल यांनी म्हटले आहे. केंद्राच्या यंत्रणा युद्धपातळीवर राबत असल्या तरी करोनाबाधितांची संख्या आटोक्यात येण्यात अपयश येत आहे. शुक्रवारी देशभरात नव्या 1752 रुग्णांची भर पडली असून ही देशात एक दिवसात नोंदविण्यात आलेली सर्वात मोठी संख्या आहे.