पुणे – खरीप हंगामात मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने तसेच पूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना व नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ऍपद्वारे दि.15 ऑक्टोबर पर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ई पीकमध्ये नोंदणी केल्यास शेतकऱ्यांना नैसर्गिक पीक विमा योजनेचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.
शेतातील पिकांची माहिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी भूमिअभिलेख विभागाने ई-पीक पाहणीचा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी अर्थात पिकाची सातबारा उताऱ्यावर नोंद करणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांना मोबाइल ऍपवर शेतातील पिकांची नोंदणी करता येत आहे. आतापर्यंत खरिपात पेरणी झालेल्या एकूण क्षेत्राची नोंद होणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात ई-पीक पाहणी करणे प्रलंबित आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास व ई-पीक पाहणीची नोंद असल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई अचूक व लवकर मिळते. पीक पेरणी अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभागामुळे कृषी पतपुरवठा सुलभ होतो. पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होत असून ऍपवर नोंद असल्यास सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास कोणतीही अडचण येत नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.
या सुविधेमुळे होणारे फायदे
- शेतकरीनिहाय पिकांच्या नोंदी घेतल्या तर निश्चित पीक लक्षात येईल.
- नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत मिळणार
- हमीभावानुसार सबसिडी मिळण्यास मदत
- पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यास मदत