नातेवाइकांनी मानले रणजितसिंह मोहिते पाटलांचे आभार
अकलूज -अकलूज व कोल्हापूर परिसरातून इराणची राजधानी तेहरानमध्ये देवदर्शनासाठी गेल्या 20 दिवसापांसून करोनामुळे अडकून पडलेले 44 यात्रेकरू यांना रविवारी (दि. 15) पहाटे भारतात आणण्यात आले. त्यांना राजस्थानातील जैसलमेर येथे 14 दिवस आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या यात्रेकरूंना भारतात आणण्यासठी माजी खासदार तथा भाजपाचे नेते रणजितसिंह मोहितेपाटील यांचा पाठपुरवा सुरू होता, त्यामुळे अकलूज येथील यात्रेकरुंच्या नातेवाइकांनी रविवारी (दि. 15) शिवरत्न बंगल्यावर रणजितसिंह मोहितेपाटील यांचे आभार मानले.
याप्रसंगी ऍड. वजीर शेख, इब्राहिम मुलाणी, इन्नुस जमादार, आलम शेख, जावेद, चिन्नु शेख, समीर शेख, एम. एम. शेख, साजन नदाफ, मोहसीन शेख आदी नातेवाईक उपस्थीत होते. इराक येथील बगदाद शहरातील सरकारे गौसपाक हे मुस्लिमांचे फार मोठे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाच्या दर्शनासाठी अकलूज शहरातील 12 यात्रेकरू, सांगोला व कोल्हापूर येथील 32 असे 44 लोक कोल्हापूर येथील साद टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्स या कंपनी मार्फत तीर्थयात्रेसाठी गेले होते. इराणमध्ये व पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसचे रूग्ण आढळले आहेत.
त्यामुळे इराण देशाने आपल्या देशाची हवाई, सागरी व भू सीमा वाहतुकीसाठी बंद केली आहे. त्यामुळे भारतातील विमाने इराण येथे जाऊ शकत नव्हते. दरम्यान, हे यात्रेकरू दि. 20 फेब्रुवारी रोजी मुंबई येथून इका (तेहरान) येथे गेले. तेथे जियारत केली. तेथुन नजफ येथे मुक्काम केला. नजफमधून करबला, काजमेन येथे 28 व 29 ला काजमेन येथे मुक्काम करून 1 तारखेला ते बॉर्डरवरती येणार होते. तेथुन कोम, माशद, माशद ते बुस्तम व नंतर 13 तारखेला ते इका मे मुंबई असा प्रवास करणार होते. परंतु इराणने त्यांची सीमा सील केल्यामुळे पुढचा प्रवास रद्द झाला.
दरम्यान, या यात्रेकरुंना राजस्थानमधील जैसलमेर येथे मिल्ट्री कॅम्पमध्ये आरोग्य विभागाच्या निगराणीखाली आणखी 14दिवास ठेवण्यात येणार आले आहे. तेथे त्यांच्या आणखी तपासण्या झाल्यानंतर यात्रेकरुंना आपआपल्या घरी पाठविण्यात येणार आहे. हे सर्व यात्री मायदेशी आल्याने त्यांच्या नातेवाइकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.