शंकर दुपारगुडे
कोपरगाव – देशात करोनाचे रुग्ण आढळल्याने सर्वांची झोप उडाली आहे. त्याची लागण होऊ नये म्हणून शासकीय पातळीवर गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे भयभीत नागरिक घराबाहेर जाण्यास टाळत असल्याने त्याचा बाजारपेठेवर परिणाम जाणवत असून, आर्थिक उलाढाल मंदावली आहे.
सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसत आहे. कोपरगाव बस आगाराच्या पन्नास टक्के गाड्यांचे चाक करोनाच्या भीतीने रुतले आहे. ग्रामीण भागासह शहरीभागात ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी आपला प्रवास टाळला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या बस आगाराने प्रवाशांअभावी बंद ठेवल्या आहेत. त्याचा थेट फटका आगाराच्या तिजोरीला बसत असून, एका दिवसाला पाच लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान आगाराला सहन करावे लागत आहे. त्यात भर म्हणून शहरतील शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिल्याने एसटी महामंडळाला अधिक आर्थिक नुकसान होणार आहे. नेहमी गर्दीने फुललेली बाजारपेठ करोनाच्या धसक्याने व ग्राहकांची संख्या रोडावल्याने ओस पडली आहे. त्यातून बाजारपेठेची आर्थिक उलाढाल मंदावली आहे.
व्यापारी वर्गात व छोट्या दुकानदारांपुढे वस्तूंच्या विक्रीचा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे. तालुक्यात करोनाचा एकही रुग्म अद्यापही आढळला नसला, तरी नागरिकांनी त्याची धास्ती घेतली आहे. गर्दीच्या ठिकाणी न जाणे, एकमेकांच्या गाठीभेटी न घेणे, हस्तांदोलन टाळणे आदी गोष्टीत नागरिक सतर्क आहेत.
उद्याचा आठवडे बाजारावरती तर्क वितर्क लढवले जात असताना देखील तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी हा बाजार शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी विभागून गर्दी कमी होऊन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री व्हावी, अशी व्यवस्था करण्याचे ठरविले आहे.
शहरातील काही शाळांना शिक्षण विभागामार्फत शाळा बंद ठेवण्याचे रीतसर आदेश प्राप्त न झाल्याने पालक, विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.