मुंबई – मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्रयरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.
मासिक पाळी हा महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व जागतिक प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने व अस्वच्छतेमुळे जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे.
भारतात दरवर्षी 120 दशलक्षाहून अधिक महिलांना मासिक पाळीचा त्रास होऊन आजारांचा सामना करावा लागतो. भारतात 320 दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या स्त्रियांपैकी केवळ 12 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकीन वापरतात. महाराष्ट्रात केवळ 66 टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिन वापरतात. याबद्दलही शहरी भागाचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीण भागातील फक्त 17.30 टक्के स्त्रियांपर्यंत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा पोहोचत असते. सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृकता नसणे, सॅनेटरी पॅड खरेदी करण्याची समस्या उद्भवणे अशा अनेक प्रश्नांना स्त्रिया सामोरे जात असतात.
सध्या महाराष्ट्रात आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त 19 वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून ग्रामीण भागातील महिलांना व बचत गटांमधील महिलांना एक रुपये नाममात्र किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थापन व विल्हेवाट –
या योजनेत जवळपास 60 लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिला असल्याने सॅनिटरी नॅपकिनचे विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गाव स्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे. या मशीनमार्फत महिलांनी सॅनिटरी नॅपकिन ची विल्हेवाट लावावी, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहेत. ही सर्व मशीन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून तसेच शासकीय निधी देणग्या तसेच सीएसआर निधीच्या माध्यमातून बसविण्यात येणार आहे. या योजनेत लाभार्थ्यांची संख्या 60 लाख अंदाजे असून वार्षिक 200 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.