श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ती चकमक अनंतनाग जिल्ह्यात घडली. त्या जिल्ह्यातील एका ठिकाणी दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली. त्या मोहिमेवेळी सुरक्षा जवानांना पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी तातडीने प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. त्यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले.
जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही महिन्यांत दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित आणि परप्रांतीयांना लक्ष्य करून हल्ले घडवले. त्या टार्गेट किलिंगमुळे अशांतता आणि घबराट पसरवण्याचे दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उघड झाले आहेत. ते मनसुबे उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांकडून धडक मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्या मोहिमांत मागील काही दिवसांत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले.