पुणे – आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो महिला वारकऱ्यांच्या आरोग्य स्वच्छता आणि सुरक्षेच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाकडून “आरोग्य वारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली.
वारी काळात दर दहा ते वीस कि.मी. अंतरावर महिलांसाठी शौचालय व न्हाणीघराची व्यवस्था असावी, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग व सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन आवश्यक, स्त्रीरोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, महिला सुरक्षिततेकरीता महिला हेल्पलाईन क्रमांक मुक्कामाच्या ठिकाणी/मंदिर परिसरात दर्शनी भागात लावावेत, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उपलब्ध करुन द्यावा, पालखी सोहळ्यासाठी निर्भया पथक तैनात करण्यात यावे आदि सूचना आयोगाने प्रशासनाला केल्या आहेत.
याबाबत पुणे, सातारा, सोलापूर जिल्हा प्रशासनासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या सदस्य गौरी छाब्रिया, सदस्य सचिव श्रद्धा जोशी, यांच्यासह तिन्ही जिल्ह्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा प्रशासनाने महिला वारकऱ्यांसाठी 1,290 फिरती स्वच्छतागृहे व 12 शाळांमध्ये न्हाणीघराची व्यवस्था केली आहे.
स्त्री रोग तज्ज्ञांची सुविधा उपलब्ध असून 30 ठिकाणी निवारा कक्ष आहेत. सोलापुरात दर दीड कि.मी. अंतरावरील निवारा कक्षात निर्भया पथक गस्त घालणार आहे, 40 ठिकाणी हिरकणी कक्ष, 25 डॉंक्टर पथक अशा सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.