राजेंद्र भुजबळ
शिर्डी – शिर्डी व राज्यातील अनेक गोरगरिबांना वरदान ठरलेले साईबाबा सुपर स्पेशालिटी व साईनाथ हॉस्पिटलचा कारभार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. रुग्णांना मोफत उपचारासाठी 1 रुपयांचा केसपेपर काढावा लागतो, परंतु पेशंट भरती झाल्यावर त्याला मोफत सुविधा फक्त कागदावरच मिळते. अनेक महागडी औषधांची लिस्ट देऊन डॉक्टर्स हे औषधे बाहेरून आणण्यासाठी मजबूर करतात, त्यामुळे मोफत उपचाराच्या नावाखाली अनेक रुग्णांची कुचंबणा होत आहे. त्यात गेल्या तीन वर्षांत औषधे खरेदीच टेंडर निघाले नसल्याने रुग्णालयाचा कारभार कसा चालत आहे, याचा प्रत्यय रुग्णांसह नातेवाईकांना येत आहे.
साईबाबा सुपर स्पेशालिटी व साईनाथ हॉस्पिटल याठिकाणी मोफत उपचारांची, शस्त्रक्रियेची व मोफत औषधांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र मोफत उपचाराच्या नावाखाली अनेक रुग्णांची कुचंबणा होत आहे. डॉक्टरांचा तुटवडा, औषधांचा तुटवडा, धूळखात पडलेले साहित्य, आपआपसातील हेवेदावे, बेशिस्तपणा यासर्व कारणामुळे दोनही हॉस्पिटलचा कारभार ढिसाळपणे सुरू आहे. येथील वैद्यकीय संचालक, साई संस्थान प्रशासनाचे एवढ्या मोठ्या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत आहे, ही बाब मोठी लाजिरवाणी आहे. वास्तविक कोणत्याही रुग्णाला नियमात बसणारे उपचार, शस्रक्रिया, औषधे हे महात्मा फुले जीवनदायी योजनेतून केली जातात. मात्र, पेशंट ज्यावेळी भरती होतो त्यावेळी येथील स्टाफ यांची हिडीसफिडीस वागणूक, वेळेवर लक्ष न देणे, सविस्तर माहिती न देणे असे कटू अनुभव अनेक रुग्णांना येतात. केवळ मजबुरी म्हणून हा सर्व अन्याय ते पोटात घालत आहे.
प्रत्यक्षात भेट दिली, त्यावेळी दोनही हॉस्पिटलच खरं वास्तव समोर आलं. याठिकाणी सर्व काम संगणकाच्या माध्यमातून चालते मात्र हे सर्व संगणक 2005 सालापासून अपडेटच झाले नाही. परिणामी हॉस्पिटल स्टाफसह रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असून रुग्ण व नातेवाईक अनेक तास भरतीसाठी ताटकळत उभे राहतात. डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना दिलेल्या तारखेला डॉक्टर्स भेटत नाही तर त्याला पर्यायी डॉक्टर्स सुद्धा नाही.
जे डॉक्टर्स आहे त्यांना त्यांच्या कामानुसार वेतन, प्रोत्साहन भत्ता, सुविधा नसल्याने अनेक डॉक्टर्स नाराज असून ते काम सोडून जाण्याच्या तयारीत आहे. वैद्यकीय संचालक यांचेही सर्व बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही हॉस्पिटल “असून अडचण नसून खोळंबा’ ! या परिस्थितीत सुरू आहे. येथील मेडिकल स्टाफच्या बाहेर होणाऱ्या बदल्या, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या वाढतच असून याकडे वेळेतच लक्ष दिले नाही तर दोनही हॉस्पिटल बंद करण्याची नामुष्की येऊ शकते.
2020 पासून औषधे खरेदी करण्याचे टेंडर निघाले नाही तर एल 1 सारखे कारण औषधांच्या बाबत देणे मोठी चेष्टा आहे. कारण रुग्णांना उच्च प्रतीची औषधे मोफत दिली तर त्यात गैर काहीच नाही. मोफत उपचारांचे सर्व पैसे राज्य शासन साई संस्थानला भरत असते, तरीही हॉस्पिटलकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?
ऍड. अविनाश शेजवळ
शिर्डी.