15 दिवसांपासून नदी दुथडी भरून वाहतेय : नदी काठच्या गावांतील जनजीवन विस्कळीत
आळंदी- या हंगामात आळंदीत इंद्रायणी नदीला तिसऱ्यांदा महापूर आला असल्याने नदी काठच्या गावांचे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने त्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यातच पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मावळ परिसरात कोसणाऱ्या दमदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीताळीत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासन डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
मावळ तालुक्यात आणि आळंदी परिसरात गेली 15 दिवसापांसून पाऊस कोसळत असून इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे दोन्ही बाजूकडील संपर्क तुटला असून भक्तीसोपान पूल व भक्त पुंडलिकासह नदी पात्रातील इतर मंदिर पाण्याखाली असल्याने नदीपात्राकडे कोणी जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर पूर पाहण्यासाठी आळंदीतील नवीन, जुन्या पुलावर भाविकांसह स्थानिकांनी गर्दी केल्याने वाहतूककोंडी होत आहे. तर अनेक जण जीव धोक्यात घालून “सेल्फी’ काढण्याचा प्रयत्न करीत असून पोलीस प्रशासन त्यांना तंबी देत आहेत.