सातारा (नागठाणे) – मुसळधार पावसामुळे नागठाणे-मांडवे ओढ्यावरील पुल सध्या पाण्याखाली गेला असताना दत्तात्रय शिवाजी साळुंखे हा युवक आपल्या दोन मित्रांसमवेत दुचाकीवरुन पुलावरुन निघाला होता. मात्र , पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुचाकी पुरातुन वाहून गेली असून तिघेही बचावले आहेत.
नागठाणे-मांडवे पुलदेखील सध्या पाण्याखाली आहे. मात्र तरीही ग्रामस्थ जीव धोक्यात घालुन पुलावरुनच ये-जा करत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारच्या सुमारास नागठाणे 22 वर्षीय युवक दत्तात्रय हा पाडळीहुन नागठाणे येथे आपल्या घरी निघाला होता. नागठाणे-मांडवे पुलावर पाणी असल्याने तो थोडावेळ त्याठिकाणी थांबलाही. मात्र, पुन्हा धाडस करुन दोघा मित्रांना दुचाकीवर बसून त्याने दुचाकी पाण्यात घातली.
थोडा पुढे आल्यानंतर पाण्याचा प्रचंड प्रवाहामुळे दुचाकी प्रवाहासोबत वाहुन जाऊ लागली. दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या दोघांनी तात्काळ गाडीवरुन उडी मारत पुलावरुन बाहेर आले, परंतु दत्तात्रय हा दुचाकीसोबत पुराच्या पाण्यात वाहू लागला. दरम्यान, पुलावर अडकलेल्या झाडात तो फसल्याने घटनास्थळावरील उपस्थित ग्रामस्थांनी त्याला पुरातून कसेबसे बाहेर काढले. मात्र, त्याची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहुन गेली.
जिल्ह्यात दोन दिवसांत तिघांचा पुरात वाहुन जाऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडला असून अनेक ठिकाणी धोकादायक पुलांवरील वाहतूकदेखील प्रशासनाने बंद केली. ग्रामीण भागातील ओढ्यांवरील पुलदेखील पाण्याखाली गेले असून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.