मंचर – संगणकीकृत सातबारा असून अडचण नसून खोळंबा, अशी म्हणण्याची वेळ आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. संगणकीकृत सातबाऱ्यात असंख्य चुका झाल्या असून त्या दुरुस्त होण्यासाठी शेतकऱ्यांना सात ते आठ महिने घोडेगाव तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. यामुळे संगणकीकृत सातबारा नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ शेतकरी बांधवांवर आली आहे.
शेतकऱ्यांचे सातबारा, आठ अ उतारे संगणकीकृत बनविताना मोठ्या प्रमाणात चुका झाल्या असून अनेक सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र कमी झाले आहे. नावे चुकली आहेत. तर काही सातबारा उताऱ्यावरील शेतकऱ्यांची नावे कमी झाली आहेत. महसूल विभागाच्या बेभरवशी कारभारामुळे शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय ते घोडेगाव तहसील कार्यालय असे वर्षभर हेलपाटे मारुनही चुका दुरुस्त होत नाहीत. आंबेगाव तालुक्यात संगणीकृत सातबारा आणि आठ अ बनविण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून अवसरी खुर्द येथील शासकीय कॉलेजच्या हॉलमध्ये सुरू आहे.
तालुक्यातील बहुतांशी तलाठी ज्येष्ठ असल्याने त्यांना संगणकाचे फारसे ज्ञान नाही. त्यामुळे ते संगणकीकरणाचे ज्ञान असलेल्या तरुणांकडून सातबारा, आठ अ उतारे संगणकामध्ये फिडींग करून घेत आहेत. सातबारा, आठ अ बनविताना तलाठ्यांनी गंभीरपणे काम केले नाही. प्रत्यक्ष सातबारा आणि आठ अ, त्यानंतर संगणकीकृत तयार झालेला सातबाऱ्यामध्ये असंख्य चुका आहेत. सदरच्या चुका तलाठ्यांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या आहेत; परंतु त्याचा मन:स्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चुकीची दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालय ते तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. वारंवार हेलपाटे मारूनही शेतकऱ्यांना सांगितले जाते की, तुमचा अर्ज गहाळ झाला आहे. तुम्ही पुन्हा नव्याने अर्ज करा, म्हणून शेतकऱ्याची बोळवण केली जात आहे.
तालुक्यात तलाठ्यांची संख्या कमी असल्याने एका तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा पदभार असल्याने ते भेटत नाहीत. तलाठी भेटला म्हणजे देव भेटला, अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे. अवसरी खुर्द येथील मानसिंग विश्वनाथ शिंदे यांची अवसरी खुर्द आणि खडकगाव या दोन्ही गावात जमीन आहे. अवसरी खुर्द गावातील संगणकीकृत सातबारा उताऱ्यावरील नावे कमी झाले आहे. तर खडकगाव येथील जमिनीवरील क्षेत्र कमी झाले आहे. शिंदे यांनी सात ते आठ महिन्यांपूर्वी तलाठी व घोडेगाव येथील एक खिडकी योजनेत अर्ज दाखल केला. त्यानंतर अनेक हेलपाटे मारल्यानंतर तुमचा अर्ज गहाळ झाला आहे. तुम्ही पुन्हा नव्याने अर्ज करा, असे सांगण्यात आले. त्यामुळे शिंदे यांनी संताप व्यक्त केला.
तहसीलदार सुषमा पैकेकरी यांना भेटूनही काम मार्गी लागत नाही, असा आरोप शेतकरी मानसिंग शिंदे यांनी केला आहे. ऑनलाईन दुरुस्तीसाठी कलम 155 अंतर्गत घोडेगाव तहसील कार्यालयात तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे असताना काम वेळेवर होत नाही. त्यासाठी हस्तलिखित सातबारा आणि या सदर कागदपत्रांची पूर्तता करूनही कामे होत नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.
सातबारा आणि आठ तयार करताना तांत्रिक चुका झाल्या आहेत. त्या दुरुस्तीसाठी तलाठ्यांनी घोडेगाव तहसील कार्यालयात ऑनलाइन पाठविल्यानंतर तहसीलदारांचा अंगठा पडताळणी करावा लागतो, अशी प्रकरणे तात्काळ मार्गी लावली जातात. याबाबत कोणी अडवणूक करीत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. तहसील कार्यालयात जलद आणि पारदर्शक काम होण्यासाठी माझा प्रयत्न आहे. कोणतीही कामे येथे प्रलंबित राहत नाहीत.
– सुषमा पैकेकरी, तहसीलदार, आंबेगाव