नगर -अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे यावर्षी मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यापासून करोनाच्या महामारीने अगोदरच शेतकरी हवालदिल झालेले असताना आता अस्मानी संकटाने त्याला घेरले आहे. अशा अवस्थेतून बळीराजा सावरायला हवा, अशी भूमिका मांडून राज्यातील प्राथमिक शिक्षक बळीराजाच्या मदतीसाठी धावले आहेत.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देऊ केला असून, पगार कपातीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे व राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला असल्याची माहिती राज्य शिक्षक समितीच्या सांस्कृतिक विभागाचे राज्याध्यक्ष तथा शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांनी दिली.
शिक्षक समितीचे नगरमधील पदाधिकारी रा. या. औटी, संजय धामणे, सीताराम सावंत, सुदर्शन शिंदे, भास्कर नरसाळे, संजय नळे, नितीन काकडे, महिला आघाडीच्या नेत्या वृषाली कडलग यांनी त्या संदर्भात नगर जिल्ह्यातील शिक्षक संघटनेशी चर्चा केली.
यावर्षीच्या अस्मानी व नैसर्गिक संकटाचा सर्वच घटकांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, त्यात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. करोनासोबत त्याला अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत कोसळलेल्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. कापूस ओला झाल्याने सडला. बाजरी-ज्वारीची उभी पिके भूईसपाट झाली. कांदा, संत्री, द्राक्ष,
डाळिंब आदी फळबागाही उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी मानसिकदृष्ट्या खचला. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याची तयारी राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दर्शविली. राज्याध्यक्ष शिंदे व सरचिटणीस कोंबे यांनी त्यासंदर्भात मदतीच्या पगार कपातीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले आहे.
शेतकऱ्यांची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. समाजघटकाला मदत करणे हे वेतन घेणाऱ्या प्रत्येकाचेच कर्तव्य आहे. राज्य शिक्षक समिती ही फक्त शिक्षकांच्या कामासाठी नव्हे, तर समाजासाठी संवेदनशील शिक्षक संघटना आहे. समाजातील कोणीतरी अडचणीत असताना आपण आनंदाने राहणे शक्य नाही. म्हणूनच शिक्षक समितीने घेतलेला हा निर्णय अभिमान वाटावा, असाच आहे. यापूर्वीही नगर जिल्हा शिक्षक समिती व गुरुकुलच्या माध्यमातून वीस लाख रुपये जमा करून आत्महत्या केलेल्या 65 शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत देण्यात आलेली आहे. राज्य शिक्षक समितीने असाच निर्णय घेतलेला असून, त्याला सर्व शिक्षक सहकार्य करतील, याची आम्हाला खात्री आहे .
डॉ. संजय कळमकर
राज्याध्यक्ष, सांस्कृतिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य