नागरिकांच्या फसवणुकीचा धोका वाढला ; कारवाईची मागणी
वाघोली : पुणे शहराच्या उपनगरीय भागात सध्या अनेक ठिकाणच्या शर्तीच्या जमिनीबाबत मा. जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील अनेक ठिकाणी सातबाऱ्यावर असणाऱ्या मनाई कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून इमारती बांधणे, सदर जागा भाड्याने देणे, त्या जागेतून बेकायदा प्रकल्प करून आर्थिक लाभ मिळवणे अशा अनेक बाबी घडत आहेत. शर्तीच्या जमिनी बाबत जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित असताना देखील वारंवार या गोष्टीकडे कानाडोळा केला जात असल्याने अशा शर्तीच्या जमिनी मधून फसवणुकीचा धोका वाढू लागला आहे. याबाबत नागरिकांकडून संबंधित सातबारावर नोंद असणाऱ्या जागा मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे शहरापासून जवळ असणाऱ्या अनेक भागातील जागा, जमिनी बाबत सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरास बंदी असा शेरा सातबाऱ्यावर असून देखील अशा जमिनी बेकायदेशीर पद्धतीने हस्तां तरण करण्यात येत असल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघड होऊ लागले आहेत. ह्या जागा व्यावसायिक उपयोगासाठी भाड्याने देण्याचे प्रकार घडू लागले आहे.
यातील धक्कादायक बाब ही भाडेकरार करून परत त्याच भाडे करारावर भाडे करार करणारी एक यंत्रणा कार्यरत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.लाखो रुपयांचे भाडे वसूल करून करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे दिसून येऊ लागले आहे. जागेच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या माहिती न घेतल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहेत. शर्तीच्या जमिनीवर जागा भाड्याने देणे, त्याच्यावर बेकायदा इमारती बांधणे, अतिक्रमण करणे, या प्रकाराबाबत नागरिकांनी मूळ कागदपत्रांची पाहणी करून व्यवहार करणे गरजेचे झाले आहे अन्यथा नागरिकांना फसवणुकीच्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
महसूल व पोलिस यंत्रणा यांच्याकडे याबाबत लागलीच नागरिकांनी तक्रार करून याबाबत न्याय मिळून जागृत दाखवावे अन्यथा शासनाकडून होणाऱ्या कारवाईस जागामालक व जागेत असणारे भाडेकरू व इतर यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. सध्या शर्तीच्या जमिनीच्या बाबत फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून याबाबत शिरूर-हवेली तालुक्यांमधून नागरिक आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू लागले आहेत याबाबत जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.