– अनाम
संगीत रंगभूमीच्या सुवर्ण युगाचे एक प्रतिभावंत शिल्पकार व लता-आशा-हृदयनाथ-उषा-मीना या पंचरत्नाचे पिता दीनानाथ मंगेशकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म गोव्यातील मंगेशी येथे 29 डिसेंबर 1900 रोजी झाला. तेथील निसर्गरम्य परिसरात दीनानाथांचे बालपण गेले. त्यांचे मूळ नाव दीनानाथ हर्डीकर. त्यांचे वडील गणेश भट्ट हर्डीकर(अभिषेकी) मंगेशी मंदिरात पुजारी होते.
वयाच्या पाचव्या वर्षापासूनच दीनानाथ मंगेशकर यांनी श्री बाबा माशेलकर यांच्याकडून गायन व संगीताचे प्राथमिक धडे घेतले. ते रामकृष्णबुवा वझे यांच्या सानिध्यात आले व त्यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले. त्यानंतर ते बिकानेरला गेले आणि किरणा घराण्याचे पंडित मणिप्रसाद यांचे वडील पंडित सुखदेव प्रसाद यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे औपचारिक प्रशिक्षण घेतले.
वयाच्या 11 व्या वर्षी ते किर्लोस्कर संगीत मंडळी आणि किर्लोस्कर नाटक मंडळीत सामील झाले. कालांतराने त्यांनी किर्लोस्कर मंडळी सोडली आणि वर्ष 1918 मधे चिंतामणराव कोल्हटकर आणि कृष्णराव कोल्हापुरे यांच्यासह बलवंत नाटक मंडळीची स्थापना केली. या नाटक मंडळीने जुन्या गाजलेल्या नाटकांबरोबर सामाजिक प्रबोधन करणारी नाटके रंगभूमीवर आणली.
दीनानाथ यांच्या चांगल्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि मधुर आवाजाने त्यांना मराठी रंगभूमीमध्ये लोकप्रियता मिळाली. ‘गंधर्व’ आणि ‘ललितकलादर्श’ अशा नाटक मंडळींबरोबर बलवंत मंडळींनी स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. दीनानाथांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वर्ष 1916 मध्ये गडकरींच्या पुण्यप्रभाव नाटकात ‘किंकिणी’ व पुढे ‘कालिंदी’ या स्त्री भूमिका केल्या. मास्टर दीनानाथांच्या गायनाने प्रेक्षकांची पकड घेतली. ‘भावबंधन’मधील ‘लतिका’, तसेच ‘रणदुंदुभी’मधील ‘तेजस्विनी’ या भूमिका यशस्वीपणे वठविल्या.
‘मानापमान’मधील ‘धैर्यधर’प्रमाणे स्त्री व पुरुष पात्रेही त्यांनी वठविली. दीनानाथांच्या गाण्यांतून व अभिनयातून प्रामुख्याने वीर, शृंगार, शांत हे रस प्रत्ययास येत असत. कुणाचेही अनुकरण न करता, स्वतःचे स्वतंत्र आणि अत्यंत भावमधुर व काळजाला भिडणारे गाणे त्यांनी गायले. मराठी नाट्यसंगीतावर बालगंधर्वप्रमाणेच दीनानाथांच्या गानपद्धतीचा ठसादेखी उमटलेला आढळतो.
नाट्यगीतांप्रमाणे शास्त्रोक्त संगीतही दीनानाथ उत्तम प्रकारे स्वतःच्या स्वतंत्र व कल्पक वळणाने गात असत. त्यांनी नाट्यसंगीतात पंजाबी ढंग प्रथम आणला असे मानले जाते. श्रीमत् शंकराचार्यांनी दीनानाथांना ‘संगीत रत्न’ म्हणून गौरवले. गायनाबरोबर भारतीय ज्योतिष, रमल इत्यादींचा दीनानाथांचा सखोल व्यासंग होता. वर्ष 1934 मध्ये ‘बलवंत पिक्चर कॉर्पोरेशन’ काढून त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यात त्यांनी अर्जुनाची भूमिका केली. त्यांची ‘सुहास्य तुझे मनासि मोही’ यासारखी या चित्रपटातील गाणी अतिशय लोकप्रिय झाली. दीनानाथांचे 24 एप्रिल 1942 रोजी पुण्यात निधन झाले.