छत्रपती संभाजीनगर – “महाराष्ट्र त्यांना स्वीकारत नव्हता तेव्हा आम्ही भाजपला खांद्यावर घेवून फिरवले. शिवसेनाप्रमुखांच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी रक्त सांडले ते देशासाठी पण तेच आज आपल्याला लाथ देत आहेत. आमचे शिवसेना नाव चोरले, धनुष्यबाण चोरणाऱ्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून नामषेश केल्याशिवाय शांत बसणार नाही,’ अशी घणाघाती टिका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेप्रसंगी बोलत होते.
ठाकरे पुढे म्हणाले, भाजपला केवळ सत्ता हवी आहे. जे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिले ते माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. ते मी स्पष्ट शब्दात अमित शहांनाही सांगितले होते. शिवसेना फोडून मिंध्यांचे ओझे घेवून तुम्ही निवडणुका लढवणार आहात का? मोठी केलेली माणसे गेली पण मोठी करणारी माणसे आजही माझ्यासोबत आहेत व त्यांना सोबत घेवूनच महाराष्ट्र जिंकूण दाखवणार.
“मोदी म्हणतात माझी प्रतिमा खराब काम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मग आम्हाला काही प्रतिमा नाही का? आम्ही काही म्हटले तर खटले आणि मोदींना बोलले तर ओबीसींचा अपमान! विरोधकांना त्रास दिला जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून चौकश्या लावून त्यांचे चारीत्र्यहनन केले जाते,’ असेही उद्धव यांनी पुढे बोलताना म्हटले.
हिंदू पंतप्रधान असताना…
जातीय तेढ निर्माण व्हायला लागेल तेव्हा निवडणुका उंबरठ्यावर आले असे समजा. सावरकर गौरव यात्रा काढा, अजून काढा. जनआक्रोश मोर्चेही काढले जात आहेत. एक मोर्चा मुंबईत निघाला व शिवसेनाभवनपर्यंत आणला. जगातील सर्वात शक्तिमान हिंदु नेता पंतप्रधान झाल्यानंतर हिंदूंना जनआक्रोश करायची वेळ आली असेल तर त्या नेत्याची शक्ति व्यर्थ आहे. मी कॉंग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले मग तुम्ही महेबुबा मुफ्ती आणि मुफ्ती मोहमंद यांच्यासोबत मांडीला मांडी घालून बसला तेव्हा काय सोडले होते? हिंदुत्वाचे मोजमाप घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही म्हणाल तोच देशप्रेमी आणि देशद्रोही ही जर तुमची मस्ती असेल तर ती गाडण्यासाठीच आम्ही वज्रमुठ आवळली आहे.
पदवी विचारली तर दंड
कर्ज काढून अनेकांनी शिक्षण घेतले. पण हल्ली असे म्हणतात डॉक्टरेटही विकत घेता येते. काही जण पाण्याचे इंजेक्शन घेवून फिरतात. पदव्या दाखवूनही त्यांना किंमत मिळत नाही. तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला लावली तर 25 हजारांचा दंड लावला जातो. पंतप्रधानांकडे अशी कोणती पदवी आहे. पंतप्रधान ज्या शाळेत शिकले त्या शाळेला अभिमान का वाटू नये?
पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून दाखवा
उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील लोकशाही संपवायची. दुसरा पक्ष संपवण्यासाठी लोकांना तुरुंगात टाकायचे काम भाजप करीत आहे. सावरकरांची गौरव यात्रा काढा पण त्यांचे स्वप्न सिंधूपासून हिंदी महासागरापर्यंत भारत हे स्पप्न पुर्ण करून दाखवा. जमीन दाखवायची असे तर पाकव्याप्त काश्मीरची जमीन जिंकून दाखवा अन्यथा गप्पा मारू नका. सरदार वल्लभभाई पटेलांचे गुजरातेत सर्वात मोठे स्मारक आहे. ते होते म्हणूनच मराठवाड्याला स्वातंत्रय मिळाले मग त्यांच्यासारखी हिम्मद पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखवा.
पंतप्रधानांवरही वचक जनतेचा हवा
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप देशात घातक प्रकार करू इच्छीते. न्यायव्यवस्था ती आपल्या अधिकारात आणू इच्छीते. ती त्यांची वाटचालही आहे. ज्या दिवशी न्यायव्यवस्थेवर भाजपचा प्रभाव असेल त्या दिवशी लोकशाही संपली म्हणून समजा. इस्त्रायली जनता पेटून उठली तेव्हा तेथील पंतप्रधानही झुकले होते. बे..बे.. करणारी लोकशाही नको. पंतप्रधानांवरही वचक जनतेचा हवा.
सध्याच्या सरकारवर जनता खूश नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, घटना पायदळी तुडवणाऱ्यांना पायदळी तुडवू. मराठवाड्यात शेतकरी, कामगारांची अवहेलना सुरू आहे. कामगारांसाठी केंद्राने मालकधार्जीणा कायदा आणला. तो आम्ही महाराष्ट्रात लागू करू दिला नाही पण मिंधे सरकार तो कायदा महाराष्ट्रात आणू पाहत आहे. कामगार, शेतकऱ्यांच्या, जवानांच्या कष्टावर देश उभा आहे. देशाला दिशा देण्याचे राजकारण्यांचे काम पण या वर्गाच्या हिताचे निर्णय घेतले जात नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही. या सरकारवर जनता खूश नाही.
मी घरी बसून कोरोनात यशस्वी काम केले
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही फसवा – फसवीचे धंदे केले नाही कधी करणार नाही. पिककर्ज माफ केले त्याचा शेतकऱ्यांना आमच्या सरकारच्या काळात लाभ झाला आता तो मिळत नाही. कोरोनाचा संसर्ग वाढतोय माझ्यावर तेव्हा टीका झाली. जे काम कोरोनाकाळात मी घरून केले ते सत्ताधाऱ्यांनी गुवाहाटी, सुरतला जावून केले नाही.
वाचू का? म्हणणारे निवडणुकीत वाचणार नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, मी आज सांगतो की, मी माझ्या वडीलांचे नाव घेतो तुम्ही मोदींना महाराष्ट्रात आणा आणि महाराष्ट्रात निवडणुका जिंकून दाखवा. उद्धव ठाकरेंना एकटा पाडायचे कारस्थान तुम्ही केले. पण कॉंग्रेस, राष्ट्रवादीने साथ दिली. तुम्ही काय चोरणार, माझे काय घेणार माझ्या आईवडीलांचे आशीर्वाद आणि आई जगदंबेचे आशीर्वाद चोरू शकत नाही. तुम्ही (एकनाथ शिंदे) सभेत खुर्च्या भाड्याने आणू शकता. भाड्याने आणलेले लोक शेवटपर्यंत तुमच्या सभेत बसत नाही. त्यांना विचार दुसऱ्यांचे लागतात, सभेत वाचू का..वाचू का..म्हणता..जनता जेव्हा मतदानाला उतरेल तेव्हा तुम्ही वाचणार नाही.
गटारगंगा खपवून घेतली नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, राजेश टोपेंनी कोरोनात खाते चांगले सांभाळले. त्यांना आत्ताही औषधांची नावे विचारा ते सांगतील पण आत्ताच्या आरोग्यमंत्र्यांना काही विचारायची गरज उतर नाही अशी कामगिरी! छत्रपतींचे नाव घेतात पण सर्वांचा छळ करता अशी यांची निती. एक गद्दार मंत्री सुप्रिया सुळेंना शिवी देतात. एक आमदार सुषमा अंधारेंना घाणेरड्या शब्दात बोलतो. हे जे बोलत आहे त्यांची शिवसेनेत हिंमत नव्हती ते बोलले असते तर लाथ मारून बाहेर काढले असते. अशी गटारगंगा शिवसेनेत कधीही खपवून घेतली नाही व खपवून घेणार नाही.
“मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांची उपेक्षा महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे ती सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली. हा मराठवाड्यातील जनतेचा अपमान आहे. राज्यातील सध्याचे सरकार नंपुसक आहे, हे आम्ही म्हणत नाही, तर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना नाव दिले, ते बाळासाहेब ठाकरेंनी धनुष्यबान चिन्हासह महाराष्ट्रभर पोहचवले. कायद्याचा आणि घटनेचा आदर सर्वांनी केला पाहिजे. त्यांला तिलांजली देण्याचे काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी केवळ 13 मिनिटे वेळ हे निंदनीय आहे. राज्याच्या विकासासाठी आता स्थिर सरकार हवे आहे.”
– अजित पवार, विरोधीपक्षनेते
“राहुल गांधींना घर खाली करायला लावत आहेत. लोकशाहीची विटंबना होत आहे हा प्रश्न केवळ राहुल यांच्यापुरता नाही. जे बोलतात त्यांचा आवाज दाबला जात आहे. राज्यात फक्त प्रसिद्धीवरच शिंदे-फडणवीस सरकारचा भर आहे. राज्याचे कर्ज सात लाख कोटींवर गेले आहे. बेरोजगारी, महागाईचे विषय सोडून गौरव यात्रा सुरू आहेत. सर्व महापुरुषांचा आम्ही सन्मान करतो पण मराठवाडा तहानलेला आणि भूकेला आहे त्याकडे सरकार लक्ष देणार आहे का?”
– अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे भाषण दृष्टीक्षेपात
– अश्फाक उल्लाह खान देशासाठी फाशीवर गेला.
– काश्मिरमध्ये अतिरेक्यांना टिपणाऱ्या औरंगजेबला हालहाल करून मारण्यात आले.
– आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही
– तुम्ही मोदींना घेऊन मी माझ्या वडिलांच्या नावाने मैदानात उतरतो.
– अकाली दल, शिवसेनेला भाजपने केवळ वापरून घेतले.
– शिवसेनेचा जन्म भाजपची पालखी वाहायला झालेला नाही.
– जे काम मी घरात बसून केले ते तुम्ही सूरत, गुवाहाटीला फिरूनही करू शकणार नाही.
– सरदार वल्लभभाईंचे पुतळे बांधता, मग पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घ्या
– देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होते आहे.
– शिवरायांचे नाव घेता आणि पाठिमागून वार करता.
– पदव्या दाखवून तरुणांना नोकऱ्या नाहीत; मोदींची पदवी मागितली तर 25 हजारांचा दंड.