उरुळी कांचन – सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजने उरुळी कांचन (ता. हवेली) येथून बेपत्ता असलेल्या 80 वर्षीय आजी सुखरूप घरी पोहोचल्या. वळती (ता. हवेली) येथील पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केलेल्या या कार्याचे कौतुक केले जात आहे.
सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचा परिणाम होताना दिसतो. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एक 80 वर्षीय आजी विस्मृतीमुळे हरवल्या होत्या. वळती ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (दि. 1) सकाळी एक 80 वर्षीय आजी दिसून आल्या. त्यांच्याशी संवाद साधला असता, त्या काही बोलत नाही व तिचे नाव व पत्ता विचारले असता सांगत नसल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते काका कुंजीर, पोलीस पाटील मोहन कुंजीर, किरण कुंजीर, नाना कुंजीर, प्रदीप कुंजीर यांना मिळाली.
विस्मृतीमुळे आजीला पत्ता आठवत नव्हता. त्यांनी आजीला खायला दिले व नाव पत्ता विचारले असता आजींनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आजीचा फोटो काढून त्यावर पोलीस पाटील मोहन कुंजीर यांचा संपर्क क्रमांकासह संबंधित माहिती सोशल माध्यमांवर व्हायरल करण्यात आली. अखेर उरुळी कांचन ग्रामपंचायतीतीलच एका व्यक्तीचा फोन आला. आजी आमच्या वस्तीमधील आहे व तिचा नातू सागर सोनवणे व त्याचे मित्र आजीला घेण्यासाठी वळतीला येत आहेत.
दरम्यान, सागर सोनवणे व त्यांचे मित्र आले असता सागरला पाहून आजीला अश्रू अनावर झाले. आजीने सागर हा नातू असल्याचे सांगितले. आजी आणि नाताची भेट पाहताच उपस्थित नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले. आजी शुक्रवारपासून बेपत्ता होती. आजी अधूनमधून कोणाला काही न सांगता घरातून निघून जाते. असे सागरने यावेळी सांगितले.
दरम्यान, यावेळी ग्रामस्थांनी आजीच्या कमरेच्या पिशवीत पत्ता व तुझा मोबाईल नंबर लिहून ठेव जेणेकरुन परत असं घडलं तर आजीचा पत्ता शोधण्यास मदत होईल अशी सूचना दिल्या. सागरने नागरिकांचे आभार मानले. आजीला ताब्यात देताना पोलीस पाटील मिलिंद कुंजीर, किरण कुंजीर, नाना कुंजीर, दत्तात्रय बबन कुंजीर उपस्थित होते. आजीची दिवसभर सेवा बबई बबन कुंजीर यांनी केली.
वळती (ता. हवेली) ःहरवलेल्या आजींना मदत करणारे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर व उपस्थित मान्यवर.