Amit Shah | Lok Sabha Election 2024 – अबकी बार ४०० पार असा नारा देत भारतीय जनता पार्टीने प्रचार अभियान सुरू केले होते. मात्र त्यांची हीच घोषणा त्यांची थट्टा उडवण्याचे कारण ठरली आहे. विरोधी पक्षांकडून याच घोषणेवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
मात्र त्यामुळे किंचितही विचलित न होता भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ओडिशातील प्रचारसभेत मोठा दावा केला आहे. पाच टप्प्यांतील मतदानानंतर भारतीय जनता पार्टीने ३१० चा आकडा ओलांडला असल्याचा दावा शहा यांनी केला आहे.
भाजपने बहुमताचा आकडा प्राप्त केला आहे व पुढील दोन टप्प्यांत आम्ही चारशेचाही आकडा पार करू असे ते म्हणाले. यापूर्वी अनेक सर्वेक्षणातून आणि राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासातून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
प्रशांत किशोर यांच्या म्हणण्यानुसार भाजपला बहुमत मिळेल तर योगेंद्र यादव यांच्या म्हणण्यानुसार ते मिळणार नाही. उलट भाजपच्या ५० जागा कमी होतील. मात्र शहा यांनी पाच टप्प्यांतच त्यांना पूर्ण बहुमत प्राप्त झाले असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, त्यांनी ओडिशातील बीजू जनता दल सरकारवर जोरदार टीका केली. नवीन बाबुंनी तमिळ बाबुंना ओडिशाचा राजा बनवले आहे. या तमिळ बाबुंनी ओडिशात लूट केली आहे. माझा नवीन बाबुंना केवळ एक साधा प्रश्न आहे त्यांच्या बाबुंचे नाही,
मला त्यांच्याकडून उत्तर हवे आहे. महाप्रभूंच्या रत्नभांडाराच्या चाव्या कुठे गायब झाल्या आहेत? नवीन बाबुंनी मला खरे उत्तर द्यावे. डुप्लिकेट चाव्या बनवल्या गेल्या आहेत की नाही? असा प्रश्न शहा यांनी विचारला आहे.