- 6500 वाहन चालकांवर कारवाई
- वाहतूक पोलिसांनी आठवडाभरात वसूल केला 19 लाख 62 हजार रुपये दंड
पिंपरी – मार्च महिना अखेर अर्थात आर्थिक वर्षाची संपत आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या आठवडाभरात तब्बल सहा हजार 699 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. या वाहन चालकांकडून वाहतूक पोलिसांची 19 लाख 62 हजारांचा दंड वसूल केला आहे.
बहुतांश कंपन्यांचे आर्थिक वर्ष एप्रिल महिन्यात सुरू आहे. यामुळे मार्च महिन्यात टार्गेट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचीच धावपळ होते. अशाच प्रकारे वाहतूक पोलिसांकडून टार्गेट पूर्ण करण्यासाठी धावाधाव सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. 24 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या कालावधीत वाहतूक पोलिसांनी नो-पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या वाहनांना जॅमर लावले आहेत.
तसेच मोबाइल टॉकिंग, ट्रिपल सीट वाहन चालकांवरही कारवाई केली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणाऱ्या रिक्षांवरही कारवाई होऊ लागली आहे. अशाच प्रकारे रॉंग साइडने येणारे आणि सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. एरव्ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असतानाही कुठेही न दिसणारे वाहतूक पोलीस गेल्या दोन महिन्यांपासून मात्र चौका-चौकात, ज्या ठिकाणी रॉंग साइडने रोज मोठ्या प्रमाणात वाहनचालक येतात, त्या ठिकाणी वाहतूक पोलीस उभे असलेले दिसत आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात बेशिस्त वाहन चालकांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाहन चालकांमुळे अपघात होतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमावावे लागतात. बेशिस्त वाहन चालकांवर जरब बसावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी 2020 पासून कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहन चालकांवर केवळ ऑनलाइन कारवाई न करतात दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजनही केले जात आहे. गेल्याच आठवड्यात वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन वाहन चालकांच्या पालकांना बोलावून त्यांना लेखी स्वरूपात समज दिली आहे. सर्वच स्तरावर कारवाई होत असल्याने बेशिस्त वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली कारवाई यापुढील काळातही सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, वाहतूक विभागाच्या सहाय्यक आयुक्त निलिमा जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षकांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला आहे. वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी केले आहे.