नवी दिल्ली – देशात काही करोना विषाणुंचे रूग्ण आढळून आल्यानंतर दक्षतेचा उपाय म्हणून भारताने आरोग्य मंत्रालयाच्या शिफारशींनुसार चार देशांच्या नागरीकांना जारी करण्यात आलेले व्हीसा/ ईव्हीसा रद्द केले आहेत. जपान, दक्षिण कोरिया, इराण आणि इटाली या देशांचे व्हीसा रोखण्यात आले आहेत.
या चार देशांतील ज्या लोकांना भारतात येण्यासाठी व्हीसा जारी करण्यात आले आहेत पण जे अजून भारतात आलेले नाहीत त्यांना आता भारतात येण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. त्यांना नव्याने व्हीसा अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. चीन मधील प्रवाशांचे व्हीसा 5 फेब्रुवारीच रद्द करण्यात आले आहेत.
वरील चार देशांतील डिप्लोमॅटिक मिशनवर येणारे अधिकारी, आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी, या देशांतील विमान सेवेत काम करणारे कर्मचारी इत्यादींना या व्हीसा बंदीतून वगळण्यात आले आहे पण त्यांना भारतात आल्यावर सक्तीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागणार आहे.
जगाच्या कोणत्याही भागातून भारतात येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाने आता आपल्याला कोणताही गंभीर आजार नाही किंवा आपण करोनाचे संशयीत रूग्ण नाही असे स्वयंघोषित प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. भारतीय नागरीकांसाठीही एक सुचना जारी करण्यात आली असून त्यांनी इटाली, इराण, दक्षिण कोरिया, जपान आणि चीन अशा देशांना भेटी देऊ नये असे त्यांना सांगण्यात आले आहे.