- शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत दोन टक्क्यांपेक्षाही कमी लोकांचा प्रतिसाद
पिंपरी – केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणात आज अखेर सुमारे 43 हजार नागरिकांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. या सर्वेक्षणाच्या आधारे शहराचे मानांकन ठरणार आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाखांच्या आसपास गेली आहे. परंतु दोन टक्क्यांपेक्षाही कमी नागरिकांनी सर्वेक्षणात सहभाग नोंदविला. तर 98 टक्के नागरिकांनी सर्वेक्षणाकडे पाठ िंफरवली.
संबंधित सर्वेक्षण 1 ते 29 फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आले. महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर संबंधित सर्वेक्षणाबाबत लिंक देण्यात आली होती. “पिंपरी-चिंचवड हे राहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे का?’ असा या सर्वेक्षणातील मुख्य मुद्दा आहे. सर्वेक्षणात 24 प्रश्नांच्या आधारे नागरिकांचा ऑनलाइन फीडबॅक जाणून घेण्यात आला आहे. नागरिकांची स्पष्ट मते जाणुन घेण्याच्या इच्छेने सर्वेक्षणात खूप बारकाव्यानिशी प्रश्न विचारलेले आहेत.
शहरात मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण किफायतशीर दरात मिळते का?, चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा किफायतशीर दरात उपलब्ध आहे का?, शहरातील स्वच्छतेची स्थिती, परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी व्यवस्था किती चांगली आहे? पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचे कसे मूल्यमापन कराल?, शहर राहण्यासाठी सुरक्षित आहे का?, सार्वजनिक ठिकाणे महिलांसाठी सुरक्षित आहेत का? शहरातील हवेची गुणवत्ता, वीजपुरवठ्याची गुणवत्ता आदींबाबत या सर्वेक्षणात प्रश्न विचारण्यात आले आहेत.
महापालिकेचे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण म्हणाले की, “राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणात आजअखेर सुमारे 43 हजार नागरिकांनी फीडबॅक दिला आहे. या सर्वेक्षणाचे विश्लेषण करून त्याच्या आधारे शहराचे मानांकन ठरणार आहे.’