जमिनींची उत्पादकता झाली कमी ः शेतात मिठासारखा पांढरा थर होतोय जमा
पळसदेव- उजनी धरणातील दूषित पाण्याचा परिणाम उजनी काठावरील गावातील शेतजमिनीवर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे येथील शेतजमीनी मोठ्या प्रमाणात नापीक होत आहेत. पिकाला पाणी दिल्यास जमिनीवर अगदी मिठासारखा पांढऱ्या रंगाचा थर जमा झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे उजनी काठावरील गावातील जमिनीची उत्पादकता कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
उजनी धरणाच्या पाण्यावर आलेला रासायनिक फेस तसेच यामुळे दुषित झालेले पाणी यामुळे जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक शेतकरी मुरमाड जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी उजनी धरणातील गाळ मोठ्या प्रमाणात शेतात आणून टाकत आहेत. सध्या उजनीचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी कमी होत आहे.
शिवाय उन्हाळ्यात अगदी पाणी कमी झाल्यावर मोठ्या प्रमाणात शेतकरी नदीपात्रातील गाळ मुरमाड जमिनीत आणून टाकत आहेत. नदीतील गाळ टाकल्यावर मोठ्या प्रमाणात उत्त्पन्न निघेल. नदी पात्रातील माती सुपीक आहे. अशा आशेवर लाखो रुपये खर्च करून शेतात माती टाकली जात आहे. मात्र काहीच दिवसात या जमिनीवर पिकाला पाणी दिल्यावर जमिनी क्षारपड बनत चालल्या आहेत.
शेतीतून कमी उत्त्पन्न मिळत असल्याने शेतकरी वारेमाप रासायनिक खते व औषधांचा वापर करून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम करत आहेत. मात्र यातून उजनी धरणाच्या काठावरील गावात मोठ्या प्रमाणात जमिनी नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाणी व आता दूषित झालेल्या जमिनी, शिवाय जमिनीला पाण्याचा वापर यामुळे हा परिणाम दिसत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे मत आहे.
एक खेप माती शेतात टाकण्यासाठी दीड हजार ते सतराशे रुपये खर्च येतो. केवळ दहा गुंठ्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च करून उजनी धरणातील माती भरली मात्र आजही ती माती टाकून देखील शेतात व्यवस्थित पीक येत नाही. उलट जमीन क्षारपड होऊन सर्व खर्च मातीत गेला आहे.
-मारुती बनसुडे, शेतकरी.
उजनी धरणातील दूषित पाण्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते, हे नेमके तपासून पाहणे आवश्य आहे. पाण्यातील सामू कमी झाल्यास ते पाणी शेतीसाठी हानिकारक असते. म्हणून पाणी दूषित होऊ नये यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रदूषण थांबवणे ही केवळ शासनाची जबाबदारी आहे. असे मानून चालणार नाही. अगदी भीमा नदीचा विचार केला तर पुण्यापासून सर्वच गावातील नागरिकांमध्ये पाणी प्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.
-राजू काळे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती इंदापूर.