चिंबळी – आळंदी-मरकळ रस्त्यावर सोळू (ता. खेड) येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना या धोकादायक खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. गेल्यावर्षीच दुरुस्त करण्यात आलेल्या या रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत. सोळूच्या मुख्य चौकात हे खड्डे असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. नागरिकांना पायी चालणेही अवघड झाल्याने नाराजी व्यक्त होत असून या भागातील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.