कोल्हापूर : फक्त मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्राचा रिमोट हाती घेणार आणि आदित्य ठाकरेंचा वरळीत पराभव करणार, असा विश्वास वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात अर्ज दाखल केलेल्या अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांनी मला बिग बॉसमध्ये ज्याप्रमाणे साथ दिली अगदी तशीच साथ मुंबईकर मला मतदानादरम्यान देतील, असेही बिचुकलेने म्हटले आहे.
कोल्हापुरात अभिजीत बिचुकलेने अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना मुंबईकर मला नक्की निवडून देतील, असा विश्वास अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केला. प्रचारनीतीबाबत विचारले असता, चिन्ह आल्यावर मी या सगळ्या गोष्टी स्पष्ट करेन, असे अभिजीत बिचुकले यांनी सांगितले. वरळीत सध्या ठाकरेंची हवा आहे याबाबत विचारले असता आपण हवा निर्माण करत नाही हवा काढून घेतो. माझ्यामुळे वरळीची निवडणूक रंगतदार झाली आहे. मी आज महालक्ष्मीच्या चरणी लीन होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असेही त्यांनी सांगितले.
आदित्य ठाकरेंविरोधातला हा सामना रंगतदार होणार आहे आणि मला कुणीही रोखू शकत नाही. तसेच सातारा माझी गादी आहे असून मीच शिवरायांचा खरा वंशज आहे. कारण मी त्यांचा वैचारिक वारसा लढवतो आहे. मात्र मला मुंबईतून लढण्याची इच्छा असल्याने मी आदित्य ठाकरेंच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे, असेही बिचुकले यांनी स्पष्ट केले.