– शर्मिला जगताप
मास्टर यंगमिंचे मूळ नाव होते येन्शू. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या गौरवास्तव चीनमधील हांगचाऊ राज्याच्या सम्राटाने त्याला “चिन्चेहू’ हे नाव दिले. सर्वलोक त्याला “मास्टर यंगमिंग’ म्हणत असत. कारण हांगचाऊ येथील यंगमिंग टेम्पलवर तो राहात असे.
त्याने संन्यास घेण्याअगोदर लोक त्याला फक्त “वॅंग’ म्हणत. तो जेव्हा वीस वर्षांचा होता तेव्हा हांगचाऊ जवळच युहांग नावाच्या देशात सरकारी अधिकारी म्हणून काम करत होता. तो खूप दयाळू होता; पण त्याच्या एका कृत्याचा त्याला पश्चाताप होत असे. कारण वयाच्या वीस वर्षांपर्यंत त्याने मांसाहार केला होता. त्यासाठी त्याने अनेक पशूंची हत्या केली.
आपण असे का वागलो, असा विचार सतत त्याच्या मनात येई. म्हणून त्याने ठरवले की, आता आपण मांसाहार करायचा नाही. उलट प्राण्यांना जीवदान द्यायचे. म्हणून त्याने त्याच्याकडच्या पैशांनी मासे, शंखशिंपले आणि इतर प्राणी विकत घेतले आणि पाण्यात सोडून दिले. हा त्याचा नित्यक्रम झाला. यासाठी कधीकधी तो सरकारी पैसे वापरायचा.
मात्र, असे करताना एकदा त्याला चोरीच्या आरोपाखाली पकडले गेले. त्याला तुरुंगात टाकण्यात आले. त्याला न्यायाधीशांसमोर उभे केले गेले तेव्हा न्यायाधीशाला विश्वासच बसत नव्हता की वॅंगने सरकारी पैसे खर्च केले. तो खोटे बोलत असावा, असे न्यायाधीशाला वाटले. मात्र, सरकारी पैसे चोरल्याच्या आरोपाखाली त्याला शिक्षा केली गेली.
त्याकाळी युहांग या देशात खूपच कडक शिक्षा केली जायची. आरोपीला रस्त्यात सर्व लोकांपुढे उभे करून त्याचे डोके धडावेगळे केले जायचे. वॅंगलाही हीच शिक्षा सुनावली गेली.परंतु युहांगचा राजा चुंगायला माहीत होते की, वॅंग हा खूप प्रामाणिक आहे. त्याने अनेक पशुपक्ष्यांना जंगलात सोडले आहे. राजा सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगतो की, वॅंगवर बारकाईने लक्ष ठेवा. जर तो घाबरला आहे असे तुम्हाला वाटले तर त्याचे डोके उडवा.
पण जर त्याला भीती वाटत नसेल, तो आनंदी दिसत असेल तर त्याने गुन्हा केलेला नाही असे समजा. तो अधिकारी वॅंगवर लक्ष ठेवतो. वॅंग खरंच खूप शांत असतो. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत असते.
तो अधिकारी वॅंगला म्हणतो, “मी आजपर्यंत खूप जणांना शिक्षा केल्या आहेत. ते माझ्यापुढे जीवनाची भीक मागतात, रडतात, त्यांच्या चेहऱ्यावर भीती असते. पण तू असा शांत कसा?
यावर वॅंग म्हणतो, “हे खरे आहे की मी सरकारी पैशांची चोरी केली आहे, पण त्यातील एकही पैसा मी स्वतःवर खर्च केलेला नाही. सर्व पैसे मुक्या प्राण्यांना वाचवण्यासाठी खर्च केले.
अधिकारी राजाला वॅंगच्या प्रामाणिकपणाची साक्ष देतो. राजा आनंदी होऊन वॅंगला शिक्षेतून मुक्त करतो. त्यानंतर वॅंग संसाराचा त्याग करून लोककल्याण व अहिंसेच्या शिकवणुकीसाठी दक्षिणेत भारत देशात गेला.
(चीनच्या लोकप्रिय लोककथेचा अनुवाद)