करोनाच्या धास्तीने “गड्या आपुला गावची बरा’
पिंपरी – पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात करोनाची धास्ती वाढल्याने आपल्या मुळ गावी जाणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढली आहे. त्यातच शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गर्दी अधिक होऊ लागली आहे. एका बाजूला पिंपरी-चिंचवडमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली असली तरी गावाकडून पुण्याकडे येणाऱ्यांचा लोंढा मात्र कमी झाला आहे.
पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच रहिवाशी, व्यापारी, विद्यार्थी व कामगारांमध्ये या आजाराची धास्ती अधिक निर्माण झाली आहे. गैरसमज अधिक पसरविले जात असल्याने आपल्या मुला-बाळांसह गावाकडे जाण्यावर अनेक कामगार भर देत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. त्यातच शाळा, कॉलेजही बंद झाल्याने शिक्षणासाठी शहरात आलेले विद्यार्थीही आपल्या गावी परतू लागले आहेत.
याचा गैरफायदा मात्र खासगी बसचालक घेत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी करू लागल्याने खासगी बसचालकांनी तिकीटाच्या दरात मोठी वाढ केली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांची संख्या शहरात अधिक आहे. या मार्गावरील बसच्या तिकीटामध्ये चाळीस ते पन्नास टक्यांची वाढ झाल्यामुळे करोनाच्या दहशतीलखाली असलेल्या नागरिकांची या बसचालकांकडून लूट सुरू असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे.
आरटीओकडून खबरदारीच्या सूचना
“करोना’बाबत रेल्वे आणि एसटीचे कर्मचारी काळजी घेत आहेत. फवारणीबरोबरच स्वच्छतेला महत्त्व दिले जात आहे. याच धर्तीवर खासगी बसचालकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तिकीट दरवाढ करू नये, असे आदेश देण्यात आले असून बसमध्ये स्वच्छता आढळून न आल्यास कारवाई केली जाणार आहे. या साठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशीक परिवह अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.