कन्नूर/कोची : कोरोना व्हायरसच्या भीतीने परदेशी पर्यटकांवर हल्ले करण्याची कृती खपवून घेतली जाणार नाही, असे केरळ सरकारने बजावले आहे. मात्र तरीही केरळची मानखाली घालायला लावणाऱ्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना कन्नूर येथे घडली. दोन परदेशी पर्यटकांना अन्न आणि पाण्यासाठी चार दिवस तडफडत उपाशी रहावे लागले.
कन्नूरमधील पय्यनूर भागात रस्त्याच्या कडेला एक परदेशी दाम्पत्य रडत बसले असल्याचे स्थानिकांनी पाहिले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळावर धाव घेतली. त्यावेळी फ्रान्स आणि इटलीहून आलेल्या दाम्पत्याने त्यांची रडकथा ऐकवली. ते म्हणाले, ते 11मार्चला कन्नूरला आले. मात्र चार दिवस त्यांना अन्नाचा कण मिळाला नाही. उपाशी पोटी आम्ही भटकत होतो. प्रत्येक हॉटेलचे दरवाजे ठोठावत होतो. मात्र, आम्हाला कोणी अन्न दिले नाही.
त्यानंतर पोलिसांनी आणि प्रशासनाने त्यांना जेवण आणि पाणी दिले. त्यांनी जेवण घेतल्यावर त्यांना तालसरी तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले. या पर्यटकांत कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजय यांनी स्पष्ट केले. ते मुंबई, गोवा आणि मदुराई येथे फिरून केरळमध्ये आले होते.