नगर -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पक्ष अभिप्राय नोंदणीमध्ये महाराष्ट्रात अहमदनगर शहराचा राज्यात पाचवा क्रमांक आल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व विविध सेलचे प्रमुख यांचा सन्मान केला. शहरात राष्ट्रवादीचे सक्रीय पदाधिकारी असून, त्यांनी पक्ष अभिप्राय नोंदणीमध्ये उत्तम कार्य केले. संघटनात्मक कामे केल्याने हे साध्य झाले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाबद्दल नागरिक व कार्यकर्त्यांचे अभिप्राय नोंदविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. यामध्ये अहमदनगर शहराने मोठ्या प्रमाणात अभिप्राय नोंदवून महाराष्ट्रात पाचवे स्थान पटकाविले.
अहमदनगर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, ओबीसी सेलचे अमित खामकर, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अल्पसंख्याक सेलचे साहेबान जहागीरदार, महिला सामाजिक न्याय विभागाच्या साधना बोरुडे, वकिल सेलचे ऍड. योगेश नेमाणे, राष्ट्रवादी युवतीच्या अंजली आव्हाड यांचा आमदार जगताप यांनी सन्मान केला. यावेळी सुमित कुलकर्णी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, अहमदनगर शहराने राज्यात पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. प्रा.माणिक विधाते यांनी प्रत्येक भागातील नागरिक व कार्यकर्ते यांचे मत नोंदविण्यासाठी सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले. राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील आघाडीचा पक्ष असून, पक्षाबद्दल असलेली सर्वसामान्यांची भावना या उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाकडे व्यक्त करण्यात आली आहे.
सदर अभियान आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राबविण्यात आले. पहिले पाच क्रमांक पटकाविणाऱ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांचा लवकरच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.