मुंबई – माझी आणि आशिष शेलार यांच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझ्या लिखाणामुळे ज्यांना त्रास होतो, असे लोक असा कंड्या पिकवतात. यामुळे राज्य सरकार अस्थीर होणार नाही, अशा शब्दात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार आणि मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांच्या सलग झालेल्या चर्चेमुळे राज्य सरकारच्या स्थीरतेबाबत विरोधकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. त्यात शेलार यांच्याशी झालेल्या कथित चर्चेच्या वृत्तामुळे आणि त्यातच केंद्रीय तपास यंत्रणांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर केलेल्या कारवाईमुळे राज्य सरकार अस्थीर होणार असल्याच्या वावड्या राजकीय वर्तुळात उठल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
राऊत म्हणाले, आमची अशी कोणतीही भेट झालेली नाही आणि जरी भेट झाली असली, तरी त्यात गैर काय? महाराष्ट्राचे किंवा देशाचे राजकारण हिंदुस्थान-पाकिस्तानसारखे नाही. पण ज्यांना माझ्या लिहिण्या-बोलण्यामुळे त्रास होतो, असे लोक अफवा पसरवतात, मी त्यांचे स्वागतच करतो.
महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटले, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय? पण मुळात अशा पद्धतीची भेट झालेलीच नाही. मी कामात होतो. पण तरी अफवा पसरवण्यात आल्या. पण अशा अफवांमुळे राजकारण अस्थिर होते का? अजिबात नाही.
महाराष्ट्राच्या सरकारला काही अडचणी निर्माण होणार नाहीत. उलट अशा अफवा पसरवल्यामुळे आमचे तीन पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. त्यामुळे अशा अफवा पसरवण्याचे हे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील, असं राऊत म्हणाले.
खूप आधी आशिष शेलार एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटले होते. तेव्हा आम्ही कॉफी देखील प्यायलो होतो. उद्यापासून विधानसभेचं अधिवेशन सुरू होतंय. त्याआधी अफवा पसरवल्या जात आहेत.सरकारचे अनेक महत्त्वाचे मुद्दे असू शकतात.
राज्याच्या हिताचे अनेक विषय आहेत. यावर चर्चा होणे आवश्यक आहे पण विरोधी पक्षांनी दोन दिवस विधिमंडळाचं कामकाज चालू दिले पाहिजे. जर विरोधी पक्षांना महाराष्ट्राची चिंता असेल, ते स्वत:ला महाराष्ट्राचे समजत असतील, तर दोन दिवस पूर्णवेळ अधिवेशन विरोधी पक्ष चालू देईल, असे ते म्हणाले.