पुणे – सत्ता आणि शास्त्राच्या आधारे विजय मिळवणारे जगात खूप देश आहेत, परंतु भगवान महावीर हे असे नाव आहे, ज्यांनी सत्याच्या आधारे विजय मिळवला. त्यामुळे ते सर्वांपेक्षा खूप अनोखे आणि वेगळे आहेत. सर्व धर्म आम्ही श्रेष्ठ असल्याचा दिंडोरा पिटतात, त्यातूनच विश्वाचे कल्याण आहे असे संदेश देतात, परंतु या विचारांना शेवटपर्यंत पोहोचवणारे भगवान महावीरच आहेत, तसे प्रतिपादन उपाध्याय प. पू. प्रवीण ऋषीजी महाराज यांनी रविवारी केले.
हिंदी विवेक प्रकाशित “तीर्थंकर भगवान महावीर’ विशेषांकाचे प्रकाशन गोयल गार्डन येथे झाले. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनाचे औचित्य साधून या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात महावीर वंदनेने करण्यात आली. यावेळी रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विशालकुमार चोरडिया, पोपटलाल ओसवाल, राजेंद्र बाठिया तसेच जैन समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी आंबेकर, पतंगे यांनीही मनोगत व्यक्त केले. तर, भगवान महावीरांचे विचार समजून घेतले पाहिजे तरच सुख शांतीची प्राप्ती होईल. महावीरांचे विचार आपल्याला योग्य मार्ग दाखवतील महावीरांनी सम्यक दृष्टिकोनातून आध्यात्मिक लाभ दिले त्यामुळे आपले जीवन समर्थ आहे, असे चोरडिया म्हणाले. पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन पल्लवी अनवेकर यांनी, आभार प्रशांत मानकुमरे यांनी मानले.