मुंबई : राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना यांनी काही निर्णय तातडीने घेतले आहेत. कोरोनाचे संकट लक्षात घेऊन आपण हे सगळे करतो आहोत हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे, देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे यात काहीही शंका नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोनाशी लढा आपण एकत्रितपणे देऊ. सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करा असंही आवाहन शरद पवार यांंनी केले.
अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका असंही आवाहन शरद पवार यांनी पोलिसांना केले. संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्ती वापरा असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. द्राक्षं आणि आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी असंही आवाहन शरद पवार यांनी केले आहे. ईएमआयबाबत सरकारने विचार करावा, फळबागांच्या नुकसानीकडे लक्ष दिले गेले पाहिजे. सगळ्या कंपन्यांनी कामगारांचे पगार कापू नयेत असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
आपल्या राज्यातले आरोग्य कर्मचारी, पोलीस हे जीवावर उदार होऊन काम करत आहेत. त्यांना घराबाहेर न पडून सहकार्य करा. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.