उंब्रज – कळंत्रेवाडी, ता. कराड येथे सुरक्षा मास्क वाटपाचा सावळा गोंधळ सुरू असून एका कुटूंबाला दोनच मास्क देण्याचा अजब फतवा येथील ग्रामपंचायत प्रशासनाने काढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.
सध्या देशभरात करोनाचे थैमान सुरू आहे. सातारा जिल्ह्यात 114 तसेच एकट्या कराड तालुक्यात 85 करोना बाधित रूग्ण सापडले आहेत. अशा या भीषण कालखंडामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत प्रशासनाने आपल्या गावातील नागरिकांची काळजी घेणे बंधनकारक आहे. बहुतांश ग्रामपंचायतीही ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर तसेच अत्यावश्यक वस्तू देऊन करोना लढ्यात सक्रिय आहेत. मात्र, कळंत्रेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याबाबत दुजाभाव केला जात आहे. प्रत्येक कुटूंबाला फक्त दोनच सुरक्षा मास्कचे वाटप करण्यात येत असून कुटुंबातील इतर सदस्यांवर अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागली आहे.
शासनाने कराड तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगातील आरोग्य विषयक योजनेतून करोनाच्या संकट काळात जनजागृतीसह गावात सॅनिटायझर बॉटल्स, सुरक्षा मास्कचे वाटप, औषधे फवारणी, रस्ते, नाले साफसफाई, पाणीपुरवठा, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना प्रोत्साहनपर भत्ता या सर्व उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीमार्फत मुबलक निधी उपलब्ध करून खर्च करण्याची परवानगी दिलेली आहे. असे असताना कळंत्रेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने उदासीन धोरण अवलंबिले आहे.
वास्तविकपणे गावाची लोकसंख्या 600 च्या आसपास आहे. त्यामुळे 600 मास्कचे वाटप करणे गरजेचे असताना कळंत्रेवाडी साठी फक्त चारशेच मास्क उपलब्ध केले आहेत. हे मास्क घरोघरी जाऊन वाटप करणे गरजेचे असताना नागरिकांनाच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बोलावून मास्कचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मास्क वाटप होणार असल्याची माहिती बहुतांश नागरिकांना नव्हती. त्यामुळे चाळीस टक्के नागरिक सुरक्षा मास्कपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही. घरोघरी सर्व सदस्यांना मास्क देणे बंधनकारक असताना ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वांना मास्क का दिले नाहीत. उर्वरित दोनशे मास्कचे काय केले असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
ग्रामपंचायत प्रशासनाने याचा विचार करून गावामध्ये सध्या सर्व्हे करणाऱ्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जावून प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांना सुरक्षा मास्कचे वाटप करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.