उत्तम पिंगळे
खूप दिवसांनी मुंबई लोकलने प्रवास केला. शनिवार असल्याने मुंबईकरांच्या दृष्टीने ती लोकल खाली होती (जी मला भरलेली दिसत होती) येता जाताना रोजच्या प्रवाशांव्यतिरिक्त कित्येक जणांची ती रोजची दिनचर्या वाटत होती जे तिच्यावर अवलंबून होते. कित्येक जण त्यात आपले छोटे छोटे धंदे चालवत आहेत. काही अगदी भीकही मागत आहेत. गर्दी इतकी वाढली आहे की रोजच्या लोकलमध्ये शिरणेही मुश्कील झाले आहे. अलीकडे गर्दीमुळे माणसे रेल्वेमधून पडून झालेल्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. मग हे रेल्वेमध्ये छोटा छोटा धंदा करणारे सकाळी बोरीबंदर वा चर्चगेटकडून मागे जाणाऱ्या गाड्यांमध्ये व्यवसाय चालू करतात व सायंकाळी उलट्या दिशेने जेणे करून त्यांना लोकलमध्ये वावरणे सोपे होते.अर्थात काही गर्दीमध्येही व्यवसाय करतात. पण शनिवार असल्याने गर्दी कमी असल्याने असे व्यवसाय करणारे सर्वच गाड्यांमध्ये दिसत होते.
सकाळी गाडीत गेलो तर थोड्याच वेळात मोबाइल चार्जर विकणारा आला व दोनशे चाळीस रुपयांचा चार्जर एकशेतीस रूपयांत सहा महिन्यांच्या गॅरंटीसह देत होता. त्यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याची कला होती. त्यानंतर एक दोन जण इअरफोन (जे अलीकडे फास्ट मुव्हींग कंज्युमर गुड) झालेले आहेत ते विकणारे आले.एकतर ते खूप स्वस्त होते (अर्थात ते खराबही लवकर होतात) पण घाईगर्दीत जायचे असल्याने ते खराब जरी झाले तरी ते दु:ख कमी होते म्हणून ते स्वस्तातले जास्त संपतात. मग पासकव्हर, किचेन, तसेच पेन हे विकणारे गेले आणि या गोष्टी नित्याचाच लागतात. चिक्कीवालाही येऊन गेला.
मग तृतीयपंथी दोन तीन जणांचा एक घोळका आला प्रत्येक पुरुषाला हाताने गोंजारून गेला कुणी काही दिले तर घेउन गेला. मग एक दिव्यांग (दृष्टीहीन) अतिशय गोड आवाजातील अभंग म्हणून जाऊ लागला. काही लोकांनी त्याच्या हातात पैसेही दिले. मग एक बाई लहान मुलाला बरोबर घेऊन सर्वांकडून भीक मागू लागली. तो मुलगा हातात प्लॅस्टिकचे भांडे घेऊन सर्वत्र फिरवत होता. एका स्टेशनवर लोकल थांबली असताना बाहेर एक सात आठ वर्षांची मुलगी जिन्यावर बसलेल्या तीन जणांना त्यातील दोन मुली व एक मुलगा 3-4 वर्षांचे असतील, त्यांना हातवारे करून काही समजावून सांगत होती. एकूणच ते भीक मागणारे होते.
मला या साऱ्यातून एक गोष्ट ध्यानी आली की या साऱ्यांचे लोकलशी काहीतरी नाते नक्की होते.त्यांच्या दृष्टीने लोकल रोज चालणे महत्त्वाचे होते. आपण हल्ली रोज नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर यावर चर्चा, गोंधळ, विरोध, जाळपोळ यावरील बातम्या व चर्चेत गुंग आहोत. संप, कामगार कपात, बेकारी, जीडीपीचा उतार, ग्लोबल वॉर्मिंग, शिक्षण, घटते व्याजदर याची आपल्याला चिंता आहे. मुलांचे भवितव्य, जिवघेणी स्पर्धा, त्याचे मार्कस्, पीएफ, विमा, घराचे हप्ते आपले टेन्शन वाढवत आहेत.लोकलमध्ये पाहिलेल्या त्या सर्वांना या साऱ्या चिंतांशी काही देणे घेणे नसून रोजची लोकल त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्या लोकलमध्ये त्यांचे रोज चालणारे काम हे त्यांना महत्त्वाचे वाटते. (अगदी रोजची भिक्षा मागणारेही) रोजची लोकल ही त्यांची रोजी रोटी आहे म्हणून त्यांना भविष्याची चिंता नाही. “लोकल चलेगी। रोटी मिलेगी।’