भुसावळ – राज्यातील अनेक भागात मागील आठवड्यात पाऊस झाला होता. त्यामुळे नागरिकांना उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती. मात्र आता पुन्हा एकदा उन्हाचा कडाका वाढला आहे. अनेक भागातील तापमान सरासरी 36 अंशांपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक देखील हैराण झाले आहे. यातच उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारी म्हणून भुसावळ जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या वेळेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार भुसावळ शहरातील 152 शासकीय व खासगी शाळांची वेळ 1 एप्रिलपासून सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात आली आहे. विद्यार्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांना देखील विनाकारण दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यातील अकोला, वर्धा, अमरावती व यवतमाळ येथे कमाल तापमान 38 अंशांच्या पुढे होते. याशिवाय किमान तापमानातही चढ-उतार होत असल्याने काही ठिकाणी पारा 12 अंशांच्या पुढे कायम आहे. त्यामुळे आता शाळेच्या वेळेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थांना दिलासा मिळाला आहे.