दिल्लीत होणार कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठका
मुंबई : देशाची राजधानी दिल्ली काही दिवसांपुरती तरी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. दिल्लीत पुढील तीन ते चार दिवस कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या मित्रपक्षांच्या बैठकांचे सत्र होणार आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्याचे मन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने बनवले आहे. आता त्या संभाव्य हातमिळवणीला अंतिम रूप देण्यासाठी काही बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने दोन्ही पक्ष सरसावले आहेत. त्यातून शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या धोरणांवर दोन्ही पक्षांत सहमती होणे आवश्यक आहे.
त्यासाठी राष्ट्रवादीच्या बाजूने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हे कॉंग्रेसशी चर्चा करण्यासाठी काही दिवस दिल्लीत तळ ठोकणार आहेत. दोन्ही पक्षांत काही बैठका होतील. त्या बैठकांमध्ये कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांची नावे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी निश्चित करतील.
शिवसेनेशी हातमिळवणी करून सरकार स्थापण्यासाठी किमान समान कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. तो कार्यक्रम आधी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पातळीवर निश्चित केला जाईल. त्यानंतर शिवसेनेशी वाटाघाटी सुरू होतील.