मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पुढच्याच दिवशी म्हणजे बुधवारी कॉंग्रेसचे सर्व आमदार जयपूरहून परतले. ते राजस्थानच्या जयपूरमधील रिसॉर्टमध्ये पाच दिवस मुक्काम ठोकून होते.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचल्याने कॉंग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी जयपूरला हलवले. आमदारांची फोडाफोडी रोखण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आले. आता शिवसेनेशी सरकार स्थापनेसाठी हातमिळवणी करण्याच्या निर्णयापर्यंत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पोहचले आहेत.
त्यापार्श्वभूमीवर, जयपूरमधून कॉंग्रेसचे आमदार मुंबईत परतले. आता ते घरी जाणार असल्याचे समजते. दरम्यान, मुंबईत परतल्यावर कॉंग्रेसच्या एका आमदाराने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना पक्षाचे आमदार कुणाच्या गळाला लागणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला.
कॉंग्रेसच्या 44 आमदारांच्या रक्तात पक्ष भिनला आहे. त्यामुळे कुणीच आम्हाला फोडू शकणार नाही. ज्यांना कॉंग्रेस सोडून जायचे होते; ते आधीच गेले. आता पुढील निर्णयांबाबत आम्हाला कॉंग्रेसच्या राज्य नेतृत्वाकडून पुढील आठवड्यात कळवले जाईल, असेही त्या आमदाराने स्पष्ट केले.