जामखेड: दक्षिण भागात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यात महत्त्वाचा म्हणजे पाणीप्रश्न असून, त्याच्या सोडवणुकीसाठीच मी निवडणुकीत उतरलो आहे. कारण पाण्याशिवाय विकास नाही. त्यासाठीच आपण व्हीजन तयार केले असून, निवडून आल्यावर हा प्रश्न सोडविण्यासाठी माझा प्रयत्न राहील. तसेच 12 एप्रिल रोजी नगरला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत देखील दक्षिण भागातील पाणीप्रश्नाकडे मी त्यांचे लक्ष वेधणार आहे, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
जामखेड तालुक्यात पालकमंत्री प्रा. राम शिंदे लोकसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार डॉ. विखे पाटील यांनी आज एकत्रितपणे प्रचार दौरा केला. त्यावेळी डॉ. विखे बोलत होते. यावेळी पालकमंत्री शिंदे, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे, डॉ. भगवान मुरुमकर, रवी सुरवसे, आजिनाथ हजारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, लोकसभा निरीक्षक प्रदीप पेशकार, निखील घायतडक, सोमनाथ राळेभात, सोमनाथ पाचरणे, अजय काशीद, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, सुधीर राळेभात, मनोज कुलकर्णी, पोपट नाना राळेभात, अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, ऍड. प्रवीण सानप, हृषीकेश बांबरसे, पांडुरंग उबाळे, प्रा. अरुण वराट, गोरख घनवट, शामीर सय्यद, गुलशन अंधारे, विलास मोरे, अंकुश ढवळे, किसनराव ढवळे, ऍड. बंकटराव बारवकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
भाजपच्या कुटुंबात येऊन 15 दिवस झाले आहेत. या पक्षातील सर्वांचा योग्य तो सन्मान राखण्याचा माझा प्रयत्न राहील. विखे पाटील परिवाराने कधीही सामाजिक दुजाभाव केला नाही. आम्ही हेलिकॉप्टरमधून फिरतो म्हणून आमच्यावर टीका होते. पण सामान्यांच्या हितासाठीच आम्ही आहोरात्र कष्ट घेतो, हे समोरच्या उमेदवाराला दिसत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
ना. शिंदे म्हणाले, लोकांची सेवा करताना कामांमध्ये अडचणी येऊ दिल्या नाहीत. मी मंत्री झाल्यानंतर तालुक्यातील सर्व संस्था भाजपाच्या ताब्यात आल्या. तालुक्यात फक्त मोजकेच लोक विरोधात होते. त्यातील कॉंग्रेसचेही नेते आणि कार्यकर्ते आता आपल्यासोबत आले आहेत. डॉ. विखे पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर टाकली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरेत भरेल असे मतदान घडवून आणा. आपला गडी बाहेर काम करायला गेल्यानंतर रान राखायची जबाबदारी तुमच्यावर आहे, असे आवाहनही ना. शिंदे यांनी केले.